Konkan Diary
Day I: मुंबई - मांडवा - अलिबाग - काशीद - मुरुड जंजिरा - दिघी - दिवेआगर – श्रीवर्धन
उद्या सायकलींगसाठी पुरेशी झोप हवी यासाठी १० वाजता झोपून सकाळी ५ वाजता उठुन सीएसटी स्टेशन येईपर्यंत मी व मुकेश फ्रेश झालो. साधारणतः ६ वाजता ट्रेन पोहोंचली. ७ वाजेपर्यंत सायकल घेण्याच्या formality करून आम्ही पार्सल ऑफिस बाहेर येउन पॅकिंग काढू लागलो. तितक्यात काही पोलिस मंडळी आमच्या सायकली, त्यावरील जनजागृतीचे बोर्ड पाहून कुतूहलाने विचारपूस करण्यास आले. कुठून आलात ? केवड्याची सायकल आहे ? किती वेगाने धावते ? गेअर टाकली कि पळते का ? तुमची रेस आहे काय ? काय काम करता ? किती लांब पर्यंत जाणार. आमचा उद्देश व आत्मविश्वास पाहून त्यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या व लगेच आम्ही ७:३० ची बोट पकडण्यासाठी गेट वे ऑफ इंडियाकडे रवाना झालो.
आजचा आमचा प्लान १३० किमी मुंबई - मांडवा - अलिबाग - काशीद - मुरुड जंजिरा - दिघी - दिवेआगर - श्रीवर्धन असा होता.
तिथे गेल्या गेल्या एका मित्राच्या (मुंबई येथील) सायकल चा shiftersचा प्रोब्लेम कळाला. आम्हाला तो सोडवता न आल्याने वेळ न घालवतो ७:४५ च्या बोटने १०० रुपये/ व्यक्ती व १००रु /सायकल देऊन आम्ही बोटने मांडवा Jetty कडे निघालो. अथांग सागरातून समुद्रापक्षांसोबत आम्ही व आमची सायकल हळू हळू मुंबईला निरोप देत अनेक मोठी मोठी जहाजे जवळून पाहत मांडव्याला ९ वाजेपर्यंत पोहोंचलो. आमच्या मित्राच्या सायकलचा प्रोब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी त्याला त्याच्या सायकलवर बसवून मी माझ्या सायकल वरून हात देऊन ३ किमी पर्यंत कसे बसे नेले. त्या सायकल शॉपवर ९० मिनिटांच्या अथक प्रयत्नात अंशतः यश आले. शेवटी १२ वाजेपर्यंत २० किमी अंतर कापून अलिबागला पोहोंचलो. तेथे ‘मिसळ पाव’ खाई पर्यंत सायकल दुरुस्त करून घेतली. ‘अलिबाग’ बस स्टॅन्ड समोर काही लोकांनी आमचा बोर्ड पाहून सायकल मोहीम व उद्देशाबद्दल विचारपूस केली. मीही त्यांच्या सोबत एचआयव्ही बाधित बालकांच्या समस्यांबद्दल संवाद साधला. ‘रवी मौर्य’ तितक्यात खारघर येथून येउन आम्हाला सामील झाला व आम्ही सोबत दुपारी १ वाजता ‘मुरुड जंजिरा’ कडे रवाना झालो. वाटेत मुंबईच्या मित्राची सायकल ‘नागाव’ जवळ पंक्चर झाली ती १०-१५ मिनिटात जोडून पुढे रवाना झालो. वाटेत कोंकणातील गावे, नारळाची झाडे, सुंदर रिसॉर्ट, कौलारू घरे पाहत, परदेश पर्यटकही आम्हाला सायकलवर पाहून शुभेच्छा देत होते. पाणी पितांना ब्रेक घेतांना आम्हाला भेटणारे स्थानिक तसेच पर्यटक आमचा बोर्ड पाहून विचारपूस करायचे आम्हीही उत्साहाने त्यांना सांगत मार्गक्रम व्हायचो.
आमचा पुणे येथील सोबती ‘राजेश कौशिक’ सकाळीच श्रीवर्धन येथे पोहोंचला होता. त्यामुळे आम्हाला संध्याकाळ पर्यंत पोहोंचने गरजेचे होते.
‘नागाव’, ‘बागमाला’, ‘रेवदंडा’ येथील मोठ्या पुलावर आलो तेथील चढ पाहून आमचा मुंबई येथील मित्र सरावाच्या अभावाने थकला. पण मी, मुकेश, रवीने यशस्वीपणे २ किमीचा चढ चढून ‘कोरलाई बीच’, ‘बाराशिव’ जवळ आलो तर तितक्यात मुंबई(विरार) येथील मित्राने पुढे येणे शक्य नसल्याने तो परत मुंबईकडे रवाना झाला. आम्ही तिघे मी, मुकेश आणि रवी ‘काशीद’ बीच मार्गे सुंदर सागरीकिनाऱ्याने ‘फणसाड’च्या घनदाट जंगलातून अवघड असे चढ उतार उतरत ‘काशीद’ येथील सुंदर समुद्रकिनार्यावर ३ किमीचा घाट चढून दुपारचा चहा घेण्यास थांबलो. तेथील पर्यटकांसोबत आम्ही संवाद साधून ‘मुरुड जंजिरा’ कडे ‘नांदगाव’, ‘माझगाव’ मार्गे समुद्रकिनारपट्टी जवळून मार्गस्थ झालो. रस्त्यात अनेक चढ होते आम्हीही हिमात्तीने चढले दुपारी ४:३० वाजता मुरुड ला पोहोंचलो. पुढे काही फोटो काढून वेळ न घालवता २ किमी चा चढ चढून राजापुरी जेट्टी येथे पोहोंचलो.
‘राजापुरी जेट्टी’ येथे आधीच शाळेतील ट्रीपची गर्दी त्यात आम्ही आमच्या सायकली आकर्षणाचा विषय झाल्या. अनेक बोटी मुलांनी खचाखच भरल्या होत्या. तितक्यात दिघीला जाणारी बोट लागली. आम्ही फटाफट आमच्या सायकली बोटीत चढवून त्याला ३ सायकल ३ माणसाचे ६० रुपये देऊन मस्तपणे आनंद घेत, व एके काळी सिद्धी जौहरचे राज्य असलेला ‘मुरुड जंजिरा’ किल्ला बाहेरून पाहत दिघीकडे निघालो.
साधारणपणे ६ वाजता आम्ही ‘दिघी’ला पोहोंचलो. पोहोंचल्यावर काही ज्येष्ठ नागरिकांनी आमच्या सायकली, बोर्ड व टी शर्ट पाहून प्रवासाविषयी कुतूहलाने विचारपूस करून शुभेच्छा दिल्या. आम्ही आमचे हेड लाईट चालू केले व ‘दिवेआगर’ च्या दिशेने रवाना झालो. तर पाहतो तर काय हा रस्ता ‘कुदगाव’ च्या घनदाट जंगलातून अत्यंत उंच चढ व घाट, बाजूला खोल दरी, निर्मनुष्य असा रस्ता व आम्ही तिघे अवघड असा ४-६ किमी चा घाट चढून वर आलो. पुढे आमच्या पोटात १/२ लिटर इंधन (पाणी) ओतले. पुढे ‘वेळास’ या गावी आल्यावर चहा घेतला व ‘दिवेआगार’ चा मार्ग विचारून मार्गस्थ झालो. कोकणातील माणसे खरीच चांगली. कारण आमच्या पोटरुपी इंजिन साठी लागणारे इंधन (पाणी) मोफत देत होते. साधारणतः ७:३० वाजता दिवेआगर शहरातून प्रसिद्ध ‘दिवेगर गणपती’ येथे पोहोंचलो. मी दर्शन घेईपर्यंत २०-२५ लोकांना जनजागृतीचे काम रवी व मुकेश ने चांगलेच केले होते. आता ७:४५ वाजता आम्ही light लाऊन श्रीवर्धन कडे समुद्रासपातीवरून निघालो तर पुनः ३ किमीचा उंच घाट पण अंधारात सायकल चालवायला व चढ चढायला मजा येत होती.
शेवटी श्रीवर्धन जवळ ३ किमीचा उंच चढ होता. हा चढ चढतांना रविला पायात cramp आले. मग आम्ही त्याला Vitamin C देऊन १० मिनिटे विश्रांती करून निघलो. रात्री ९ वाजतो श्रीवर्धनला पोहोंचलो. आता मुकेश ला प्रचंड भूक लागली होती. आम्ही तसेच आधी Restaurant मध्ये जाऊन मी जेवण मागवले. मी आणि राजेश ने Vegeterian जेवण तर मुकेश आणि रवी ने कोकणी मास्यांवर ताव मारला.
रात्री राजेशने आधीच तंबू लाऊन झोपण्याची व्यवस्था केली होती. कॅम्पिंग टेन्ट मध्ये झोपण्याची माझी पहिलीच वेळ व दिवसभर १३० किमी सायकल चालवल्यावर अंघोळ केली कि लगेच शांत झोप लागली.










No comments:
Post a Comment