Konkan Day III: आंजर्ले बीच - मुरुड बीच - लाडघर बीच - दाभोळ - गुहाघर - जयगड - गणपती पुळे
सकाळी ६ वाजता सर्व उठून ७: १५ पर्यंत तयार होऊन पोटात चहा व बिस्किटे रिचवत ७:३० ला बाहेर पडलो. सुंदर असे ‘आंजर्ले’ बीचवर ३० मिनिटे थांबून ८ वाजता हर्णै गावा कडे निघालो. वाटेत आंजर्ले गावातील १ किमीचा उंच चढ चढून मुरडी मार्गे निघालो. तर पुन्हा ३-४ किमीचा उंच व वळणाचा घाट चढून एका टेकडीवर पोहोचलो . त्या टेकडीवरून पाहतो तर काय ? अथांग सागर, हर्णै गाव, एकीकडे खोल दरी, तर एकी कडे दाट धुक्यातून सह्याद्रीच्या डोंगर रंग दिसत होत्या व सुंदर असा सूर्योदय पाहून आम्ही तर जाम खुश झालो. असे वाटले कि काल रात्री इथेच तंबू लावला असता तर ?
लगेच आम्ही जसे काय पृथ्वी वरील स्वर्गावर आल्या सारखे आनंदी होऊन फोटो सेशन चालू केले. जवळपास ३०-४० मिनिटाच्या फोटो सेशन नंतर आम्ही पुढे ‘मुरुड बीच’ कडे निघालो. पुढे ३ किमीचा उतार उतरून स्वतःच्या सायकलच्या वेगावर नियंत्रण ठेवत ‘पालंडे’चा उतार उतरून समुद्राजवळून जात सुंदर रेसोर्ट्स पाहत ‘मुरुड बीच’ कडे वळलो. मुरुड समुद्रकिनार्यावरून आम्ही आमच्या सायकली समुद्राच्या वाळूवरून nonstop ८ km चालवत पाण्यातून, खडकावरून चालवत, पाणी उडवत, बीच वरील पर्यटकांना व लोकांना एड्स विषयी जनजागृती करत लाडघरच्या समुद्रकिनाऱ्यावर पोहचलो. रवी व राजेश इथे मागे पडले होते. पुनः १ किमीचा चढ चढून बुरांडी गावात रवी, राजेश साठी थांबलो. पण त्यांना वेळ होता. म्हणून आम्ही दोघांनी सकाळचा ‘वडा पाव’ नाश्ता करून दोघेच पुढे निघालो. पुन्हा ३ किमी चा उंच चढ, वळणदार घाट चढत वर आल्यावर आम्हाला पृथ्वी वर उभा असलेल्या भगवान ‘परशुरामाने’ (मूर्ती) ने दर्शन दिले. आम्ही पण त्यांच्या सोबत छायाचित्र काढून घेतले . ‘दाभोळ’ला जाणारा रस्ता हा उंच डोंगर रांगामधून, जंगलातून जात होता. आम्ही देखील जोमाने सायकल चालवत होतो. पुढे उंचावर आल्यावर आम्हाला पलीकडच्या डोंगरावर दाभोळ औष्णिक वीज प्रकल्प दिसला. ‘काजूवाडी’ जवळ ‘मुकेश’ थकल्यासारखा वाटत होता. आम्ही लगेच ‘माझा’ शीत पेय पिउन चार्ज झालो व ४-५ किमीचा धोकादायक उतार सावधपणे उतरत ‘दाभोळ जेट्टी’ला पोहोंचलो. तिथे पाणी, कोकम शरबत घेई पर्यंत आमची बोट सुटली व पण हि संधी आम्ही वाया न घालवता तेथील आमच्या एड्स जनजागृती सायकल मोहीम विषयी चर्चा केली. काही वेळानी बोट आल्यावर २ सायकल व २ माणसांचे ५० रुपये देऊन आम्ही समुद्र ओलांडून ‘धोपावे’ जेट्टीला पोहोंचलो.
‘गुहागर’चा रस्ता विचारात पुनः २-३ किमीचा चढ चढून आम्ही गुहागर कडे एन्रॉन च्या सीमेंट काँक्रीटच्या जंगलातून जातांना घामाने ओले झालो होतो. लगेच घोट घोट पाणी पिट अक्खी १ लिटर ची बॉटल संपवून ‘दाभोळ औष्णिक वीज प्रकल्प’ समोरून जातांना पर्यावरणाला पोहोचवणाऱ्या शासनाच्या औद्योगीकरणाच्या धोरणाच्या नावाने शिव्या हासडत शेवटी ‘गुहागर’ पोहोंचलो. दुपारचे ३ वाजले होते. पोळी भाजीचे जेवण करून ‘हेडवी’ चा रस्ता विचारात २ किमीचा चढ चढून ‘चिपळूण’ नाक्यावर आलो. वारंवार मुकेश मागे पडत होता. मी त्याची वाट पाहत थांबत होतो. मुकेशने थकल्याचे व दमल्याचे सांगितले म्हणून आम्ही हळू हळू पुढे निघालो. ‘हेडवी’चा ३ किमीचा चढ चढून पुनः २ किमीचा उतार उतरून ‘हेडवी’ गावात आल्या आल्या मुकेशला पायात cramp आल्याने आम्ही थांबलो. मुकेशला त्याचा अति आत्मविश्वास महागात पडला. त्याला ‘व्हिटॅमिन क’, ‘ग्लुकोज’ देऊन मग चहा बिस्कीट खाऊ घातले. ‘हेडवी’च्या गणपती मंदिरात विश्रांतीचा सल्ला दिला. पुनः १ किमीचा चढ चढून मंदिर परिसरात पोहोचलो. हेडवी येथील प्राचीन गणपती मंदिराचे दर्शन घेतले व तोपर्यंत मुकेश आराम मिळाल्याने व हायड्रेशन मुळे फ्रेश झाला.
‘हेडवी’ ते ‘तवसाल’ जेट्टी २८ किमीचे अंतर आम्ही थोडा चढ , मग पठार मग ‘रोहिले’ बंदराजवळून जात ३ किमीचा उतार उतरून ५ वाजता ‘तावसाल’ पोहोंचलो. आम्ही दोघांनी वडा पाव, कोकम शरबत घेऊन फ्रेश झालो. आम्ही दोघे जे सकाळपासून ‘आंजर्ले ते तावसाल’ १०५ किमी दरम्यान सायकल चालवत होतो तर वेळो वेळो तेच तेच पर्यटक आम्हाला भेटत होते. त्यांनी आमच्या सायकलची गती व stamina बद्दल आश्चर्य व्यक्त केले. कारण ते तर ‘तवेरा’, ‘इनोवा’ सारख्या वाहनामध्ये व आम्ही ‘सायकलवर’ हे कोंकण पाहत जनजागृती करत होतो.
सायंकाळी ५:३० वाजता किनाऱ्याला बोट लागली. आम्ही देखील मस्त पणे मावळत्या सूर्याचा अर्थात सुर्यास्ताचा आनंद घेत ६ वाजता बोटने ‘जयगड जेट्टीला’ पोहोंचलो. लगेच १ किमीचा कठीण चढ चढून स्फूर्तीने ‘गणपती पुळे’ कडे निघालो. जे कि, केवळ २४ किमी बाकी होते. मस्त थोडे फार चढ उतार वेगाने उतरत शर्यत लागल्यासारखे वेगाने सायकल चालवू लागलो. कारण आम्हाला काही तरी जिंकल्याचा आनंद होत होता. चढ, घाट, दरी, डोंगर, दमा, थकवा नावाची भीती यावर विजय मिळवल्याचा १३० किमी अंतर २० चढ एका दिवसात पूर्ण केल्याचा आनंद होत होता. संध्याकाळच्या वेळी ‘नांदिवडे’, ‘मालगुंड’ च्या समुद्रकिनाऱ्याजवळून आम्ही सायकल चालवत ७ वाजता ‘गणपती पुळे’ पोंहचलो. तिथे केवळ २०० रुपयात चांगली सुविधायुक्त खोली मिळाली.
फ्रेश होऊन गणरायाचे दर्शन घेतले. पोटभर जेऊन उद्या ‘पावस’ पर्यंत जायचा plan करून झोपलो.
रवी व राजेश हे आमच्या २५ किमी मागे ‘तावसाल’ येथे मुक्कामाला थांबले होते.





































No comments:
Post a Comment