Konkan Diary Day II: श्रीवर्धन - बागमंडला - बाणकोट - केळशी - अंजर्ले
दुसऱ्या दिवशीची सुरवात सकाळी उशिरा झाली. सकाळी ८ वाजता मी आणि मुकेश उठून फ्रेश तर झालो पण आमचे मुंबईकर सोबती उशिरा उठल्यामुळे आम्ही १०:४५ ला तंबू आवरून बाहेर निघालो. वाटेत ‘बालाजी पेशवा’ यांच्या स्मारकास भेट देऊन सुंदर असे ‘श्रीवर्धन बीच’ पहिले. पुढे बस स्थानक जवळ ‘मिसळ पाव’ पोट भर खाऊन भर दुपारी बारा वाजता ‘हरिहरेश्वर’ कडे निघालो.
साधारणतः १ किमीचा चढ व नंतर उतार असे आम्ही १०-१५ km पुढे आल्यावर ‘बागमांडला’ जेट्टी कडे निघालो. तर पाहतोय काय उंच डोंगर आम्ही सुद्धा जोमाने चढाई चालू केली. ३ किमी चढ चढून सुद्धा घाट संपत नव्हता. तर मुकेशला सायकल जड जात होती. लगेच रवीने Allen Key ने पाठीमागचा ब्रेक लूज केल्यावर मुकेश च्या मागच्या टायर मधील जाम थोडा सैल झाला. दुरुस्ती झाल्यावर आम्ही पुढे मार्गस्थ झालो. एका उंच ठिकाणी आल्यावर आम्हाला सुंदर असे विहंगम दृश्य दिसले. डोंगरामधून सावित्री नदी मार्गक्रम करत सागराशी संगम होतांना व सोबत पसरलेले सुंदर असे backwater दिसत होते. मी राजेशला म्हटलो उंच घाट चढल्यावर हे दृश्य पाहून पैसे फिटले. लगेच आम्ही फोटो सेशन सुरु केले. राजेश म्हणाला “अरे आगे और वसुली करनी है तो चलो”. पुढे निघाल्यावर आम्हाला ३ किमीचा धोकादायक असा तीव्र उतार व खराब रस्ता. ब्रेक दाबत आम्ही ‘बागमांडला’ जेट्टीला पोहोचलो. पण पाहतो तर काय १:३० ची बोट गेलो होती. आम्हाला दुपारी २:३० पर्यंत वाट पहावे लागणार होते. लगेच आम्ही फोटो सेशन करून थोडा पोटात इंधन भरून (ग्लुकोज, खजूर, नमकीन) वेळेवर बोट मध्ये बसून ३० मिनिटात ‘बाणकोट’ येथे पोहोंचलो.
थोडा चहा घेऊन, बॉटल मध्ये पाणी भरून ‘केळशी’च्या दिशेने ‘वेसवी’ गावातून एक उंच २ किमीचा चढ चढून डोंगरातून व जंगलातून ‘शिपोले’, ‘उमरोली’ मार्गे ‘गावळवाडी’ येथे आलो. मागील आमचे कार्यकर्ते यायला वेळ होता. थोडी विश्रांती घेतली तर तेथे नांदेड येथील आपल्याच मराठवाड्यातील कामगार भेटला. त्याच्याशी गप्पा मारत आम्ही सर्वांनी चहा घेऊन पुढे ३ किमीचा उतार उतरत ‘मांडीवली’ गावातून ‘केळशी’ कडे निघालो.
पुनः ‘केळशी’ च्या आधी अवघड २-३ किमीचा चढ चढून पुढे केळशी गावात प्रवेश केला. गावातील शाळकरी मुले आमचा बोर्ड पाहून विचारपूस करू लागली. त्यांना उत्तर देऊन पुढे ‘आडे’ गावाच्या पुलावार आल्यावर आम्हाला भूक लागली होती. तेथे फोटो सेशन करून पोट भर घरून आणलेल्या दशम्या खाल्या.
रवी, राजेशची इच्छा लांब जायची नव्हती मग वाटेत ‘आडे’ बीचवर १ तासभर सुर्यास्ताचा आनंद घेत थांबलो. पुढे आंजर्ले गावात जाऊन केवळ ४०० रुपयात श्री प्रभाकर यांच्या कडे रूम मिळाली.
रात्री फ्रेश होऊन पोटभर कोंकणी जेवण जेऊन झोपलो. पण मला दिवसभरात केवळ ६० किमी सायकलिंग झाल्याने असमाधान वाटत होते. म्हणून उद्या कोणत्याही परिस्थितीत गणपती पुळे पोहोंचने हा उद्देश मुकेशला बोलून दाखवला. मुकेशनी सुद्धा प्रचंड आत्मविश्वासाने अरे सर आपण तर सहज रत्नागिरी पर्यंत पोहोंचू शकतो. उद्या लवकर उठणे व लवकर निघने असे ठरवून रात्री झोपलो.
























No comments:
Post a Comment