Sunday, January 30, 2022

टोंक बुंदी कोटा 145 किमी एड्स जनजागृती सायकल यात्रा





















 


18 नोव्हेंबर 

कालच्या हेक्टिक आणि टफ राईड नंतर रात्री छान झोप झाली शिवाय ढगाळ वातावरण असल्याने काल पेक्षा थंडी कमी अर्थात 8 किंवा 9 'C इतकी होती. रात्री धर्मशाळा चालकाने पाण्याची मेन लाईन बंद केल्याने थोडी गैरसोय झाली. असो बडे बडे शहरो में छोटी छोटी मुश्किले आती रहती है. सकाळी आवरून 7 वाजता अग्रवाल धर्मशाळायेथे चहा घेतांना तेथील care taker विचारत होता "आपको रास्ते में पुलीस वाले परेशान करते होंगे". आम्ही म्हणालो "परेशान ? बिलकुल नहीं बलकी हमे सहयोग देते है, खुद हो के पाणी देते है, आगे का रास्ता, रात में ठहरने की व्यवस्था आदी" त्यांना निरोप देऊन टोंक येथून निघालो. मी तसा मारवाडी पण 100 वर्ष पेक्षा अधिक महाराष्ट्रात आमचे कुटुंब असल्याने आमची मराठी मारवाडी पेक्षा अधिक चांगली असून उलट मारवाडी मध्ये जरा खिचडी झाली आहे. तरी काल पासून अनेक लोकांशी मारवाडीत संवाद झाला पण त्यांनी आमची खिचडी मारवाडी भाषा ओळखून लगेच म्हणाले "आप दक्खन से हो क्या ?".

बस झाल्या गप्पा आणि आमची सकाळी आभाळ वातावरण असल्याने थंडीचा त्रास नाही झाला.

  आज मी आणि पाटणकर सर मनाने देखील ताजे झालो होतो. सर्व नकारात्मकता रात्रीच त्यागून सकाळच्या सूर्याच्या किरणाने मिळालेल्या उर्जाने आम्ही कोटा हायवे ने निघालो. आजचा दिन विशेष होता कारण मागील 7 दिवसांत आज आमचे 1000 किमी सायकलिंग पूर्ण करून कोटा पोहोचणार होतो. 


आजच्या तिसऱ्या मुक्कामी अर्थात शिक्षणाचे माहेरघर 'कोटा' म्हणजे IIT आणि NEET मधील टॉपर्स विद्यार्थांना घडवणारे केंद्र कदाचित आता COMMERCIAL HUB बनले असेल....असो

तसेंच 'कोटा फॅक्टरी' या वेब सिरीज मुळे कोटा विषयी बऱ्या पैकी माहिती होती. 

 आज कालच्या चुका टाळल्या अर्थात वेळेवर नास्ता , चहा पानी आणि Hydration. दोघे अत्यंत संयमाने पेडलिंग करत राईड चा आनंद घेत सकाळी 09 वाजता 35 किमी नंतर भरनी या गावाच्या पुढे धाब्यावर नाश्ता मध्ये चहा बिस्किटे आणि चिवडा इतकेच मिळाले.   पण सोबतचे राजगिरा लाडू ची भूक लागल्यावर चव एकदम रुचकर लागते. पुढे सरोली जवळ रस्त्याच्या बाजूला माधवप्रसाद आश्रम जवळ तलाव आणि जवळ च्या परिसरात  बहरलेली शेत असे विहंगम दृश्य होते. ते तलाव पाहून आम्ही निसर्गाच्या सानिध्यात सायकलिंग चा आनंद लुटत पुढे निघालो. 50 किमी नंतर दुनी तहसील ओलांडले.  9:30 वाजून गेले होते.  पुढे डोलता - कुचलवाडा - टिकर दरम्यान 10 ते 15 किमी रस्त्याचे काम सुरू असल्याने  एकेरी वाहतूक वळवल्याने इथे सांभाळून चालवावे लागले. रस्त्याच्या बाजूला काटे, काचेचे तुकडे पासून टायर ला सांभाळून चालवत असतांना अखेर 80 किमी नंतर हिंदोली गावा जवळ टायर पंचर ! 


पण आज मी शिवी नाही हसडली. अत्यंत संयमाने टीम वर्क ने कामाला लागलो. मी टायर disment करून चाक उघडून ट्यूब बाहेर काढे पर्यंत पाटणकर सरांनी कालचे पंचर जोडले. नंतर ते जोडलेले पंचर पुन्हा हवा मारून चेक करून फिट केले. इकडे हे सर्व टायर फिटिंग करून सायकल रेडी करे पर्यंत पाटणकर सरांनी दुसऱ्या ट्यूब चे पंचर जोडले. तोपर्यंत पॅनियर बॅग कॅरियर वर फिट केली आणि जय भोलेनाथ म्हणत निघालो.


वाटेत सायकलवरील एड्स जनजागृती बोर्ड पाहून सगळ्यांचा पहिला प्रश्न असायचा "सरकार के पास से आयो हो क्या ? ये सायकलिंग के पैसे मिलेंगे क्या ? रेस है क्या ? आदी. "

पण जेव्हा त्यांना मी देखील मारवाडीत संपूर्ण उद्देश सांगायचो तेंव्हा आश्चर्याने आ वासून पहायचे. 

जवळपास 95 किमी आलो असेल. इथे छोट्या मोठ्या डोंगर रांगा असल्याने चढ होता. पण वातावरणात गारवा आणि निसर्गाने जरा जास्तच कृपा केली. पाऊस सुरू .......रिमझिम सुरू आणि आणि आम्ही पण त्याच रिमझिम चा आस्वाद घेत 2,3 चढ चढत वर आलो. पाऊस थांबत नाही हे पाहून मी 2 इन 1 जॅकेट घातले कारण पावसासोबत थंडी पण खूप होती. काल पाटणकर सर चे  रस्त्यात स्वेटर पडले होते. मग मी त्यांना थर्मल आणि रेफलेक्टर जॅकेट दिले.  मागील 20 किमी पासून पावसात भिजत सायकलिंग सुरू होती. पुढे बुंदी गावा जवळ आलो.  तर एका बाजूला बुंदी चा नयनरम्य आणि नवल सागर तलाव  त्यात या पावसात देखील डोंगराचे प्रतिबिंब दिसत होते. आम्हाला सेल्फी चा मोह आवरला नाही. इथून ऐतिहासिक वास्तू व प्रेक्षणीय स्थळ जैत सागर किल्ला,  लतारागढ किल्ला व  गढ महल जवळच आहे. या तलाव जवळ नवल सागर उद्यान छान विकसित केले आहे. 


प्राचीन बुंदी प्रदेशावर मीणांच्या उषार गोत्राचे राज्य होते, परंतु अक्रंकटा राजपूतांनी जुन्या शहराचा नाश केला. सध्याच्या बुंदीची स्थापना राव देवा हाडा यांनी 1242 मध्ये जैता मीनाची कपटाने हत्या करून केली होती. राजा बुंदा मीनाच्या नावावरून या भागाला ‘बुंदी’ असे नाव पडले. पुढे या नाल्याचे पाणी अडवून नवलसागर तलाव बांधण्यात आला. राजा देव सिंह यांच्यानंतर राजा बारसिंगने 1354 मध्ये टेकडीवर तारागड नावाचा किल्ला बांधला. यासोबतच किल्ल्यात राजवाडा आणि तलाव-बावडीओ बांधण्यात आला. 14व्या ते 17व्या शतकाच्या दरम्यान पायथ्याशी एक भव्य राजवाडा बांधण्यात आला. 1620 मध्ये राव रतन सिंह जी यांनी राजवाड्यात प्रवेश करण्यासाठी एक भव्य खांब (दरवाजा) बांधला. दोन हत्तींच्या पुतळ्यांनी सजवलेल्या खांबाला ‘हत्तीपोल’ म्हणतात. बुंदी त्याच्या विशिष्ट चित्रकला शैलीसाठी प्रसिद्ध आहे, ती महाराव राजा "श्रीजी" उमेद सिंग यांनी बांधली होती, जे त्यांच्या चित्रकला शैलीसाठी जगप्रसिद्ध आहेत. हा झाला बुंदी चा इतिहास. 


पुढे आणखी एक चढ चढून आम्हाला दीड किमी चा बुंदी हायवेवर बोगदा लागला जो सायकल चे दोन्ही लाईट लावून काळजीपूर्वक सायकल चालवत बोगदा मधून सायकल चालवत बाहेर आलो. आता जाम भूक लागली होती. पावसात भिजल्यावर थंडी पण वाजू लागली. दाल बाटी वर मस्त ताव मारला. हुडहुडी काही कमी होईना मग अखेर  जॅकेट चढवून बसलो. पावसाकडे पाहत घोटभर चहा घेतला. दीड तास झाले पाऊस थांबत नाही म्हणून आणखी एक चहा घेतला. पुढे अखेर आम्ही पावसातच सायकल चालवायचा निर्णय घेऊन लाईट, रेफलेक्टर जॅकेट चढवून निघालो. 


रिप रिप पाऊस सुरूच होता अखेर सकाळपासून 135 किमी नंतर कोटा कडे मेन रोड ने वळालो. इथे पुणे येथील लाहोटी uncle  यांच्या पुढाकाराने स्थानिक उद्योगपतींनी कोटा येथे माहेश्वरी Resort मध्ये राहण्याची सोय केली होती. हॉटेल, लॉज आम्ही शक्यतो टाळतो पण त्याच्या प्रेमा खातर हे आदरातिथ्य स्वीकारून आजची 144 किमी राईड पूर्ण करून कोटा पोहोचलो. 

कोटा येथील कृषी विद्यापीठ व कृषी विज्ञान केंद्र कृषी विषयक संशोधन साठी प्रसिद्ध आहे. तसेच IIT आणि NEET मधील टॉपर्स विद्यार्थांना घडवणारे केंद्र तर आपल्या सर्वांनाच परिचित आहे. 

 माहेश्वरी रिसॉर्ट चे मालक राजकुमारजी माहेश्वरी यांनी खूप छान आदरातिथ्य व जेवणाची व्यवस्था केली होती. त्यांनी त्यांचे रिसॉर्ट्स मधील विविध रंगबिरंगी कारंजे, प्रकाशव्यवस्था, लायटिंग, लहान मुलांसाठी विविध खेळ, बोटिंग आदी  दाखवले. अजूनही पाऊस सुरूच होता पण पाऊस उद्या तरी थांबू दे अशी वरुण राजाला प्रार्थना करून झोपी गेलो. 


डॉ पवन चांडक 

9422924861

Saturday, January 29, 2022

शाहपुर जयपूर निवाई टोंक 160 किमी एड्स जनजागृती सायकल यात्रा

 


















17 November 2021 


डोंगराळ भाग असल्याने शिवाय गावाबाहेर हे लॉज असल्याने रात्रभर थंडी जाणवत होती. तरी पहाटे 5:30 ला उठून आवरून  17 नोव्हेंबर च्या सकाळी 06:30 वाजता निघालो, वातावरण ढगाळ असल्याने सूर्यनारायण चे दर्शन झाले नाही.  सकाळी 18-19 ची स्पीड ठेवत मनोहरपूर येथे एका टपरीवर वाफाळलेला चहा आणि सोबत पारले जी  बिस्कीट घेऊन निघालो. येथील रस्ते पूर्णपणे फ्लॅट नसून बरेच चढ उतार होते. पुढे 35 किमी नंतर  चांदवाजी गावा जवळ एक रस्ता जयपूर बायपास ला जाणारा पण आम्ही जयपूर कडे जाणारा रिंग रोड ने निघालो. हा सिंगल रोड होता पण वाटेत दुतर्फा शेत, रस्त्याच्या उजव्या बाजूला छोट्या टेकड्या, वाटेत शाळेला जाणारी मुले आम्हाला टाटा म्हणत हात दाखवत होती. थोडं पुढे आल्यावर कोणी तरी आवाज दिलं पाहतो काय तर सायकल च्या कॅरियर वर रात्री न वाळलेले कपडे पडले होते. पुन्हा थोडं मागे जाऊन उचलून व्यवस्थित बांधून निघालो. या भागात शाळा सुरू झाल्या असल्याने शाळकरी मुलांची वर्दळ होती आणि हायवे पेक्षा हा रस्ता कमी रहदारीचा होता.  अचरोल नंतर छोटेसे जंगल लागले या जंगल वाटेतून सायकलिंग करायला मजा येत होती. 08:30 नंतर सूर्य हळूहळू वर आल्याने त्याच्या प्रकाशाने टेकडी, टेकडी खालच्या वस्ती व शेतं प्रकाशात न्हाऊन निघाली. आता वातावरण मस्त असल्याने सायकलिंग ला मजा येत होती. पण चढ उतार असल्याने वारंवार गियर बदलावे लागत होते.  लाबना गाव ओलांडत रस्त्याच्या दुतर्फा एका पेक्ष्या एक भारी असे राजवाड्या सारखे हॉटेल व रिसॉर्ट आणि त्याचे वैभव बाहेरूनच पाहत आम्ही पुढे जात होतो. पुढे एक छोटासा चढ लागला व छोटेसे जंगल ज्याला नाहरगढ फॉरेस्ट म्हणतात तिथून पुन्हा उतार लागला. इथे नाहरगढ बायोलॉजिकल पार्क व इथून आमेर जवळ एलिफंटास्टिक एलेफँट वाईल्ड लाईफ संच्युरी प्रसिद्ध आहे. आमचे अंतर बरेच असल्याने आम्ही त्या सफारी ला प्रत्यक्ष भेट देऊ शकलो नाही. पुढे आमेर गाव लागले. इथे  अंबर फोर्ट म्हणून प्रसिद्ध ऐतिहासिक किल्ला आहे. जवळच जयपूर येथील प्रसिद्ध जल महल आहे. जे  मान सागर तलाव मध्ये वसले आहे. आम्ही त्या झिल जवळून सायकलिंग करत पुराणी चुंगी सर्कल पार्क मार्गे जयपूर शहर  उजव्या बाजूला ठेवत निघालो. मागील अर्धा तास पासून भूक लागली होती परंतु योग्य हॉटेल न मिळाल्याने छिड छिड होत होती. अखेर एका गाड्यावर ढोकळा, कचोरी व दाल का शीरा चा पोटभर आस्वाद घेतला. भूक इतकी लागली होती की किती प्लेट खाल्ले की कळलेच नाही. पुढे सुंदर जयपूर शहरातून मार्ग काढत रिंग रोड ने सुराजपोल अनाज मंडी जवळून, उर्मिला उद्यान मार्गे वाटेत जियोलॉगिकल सर्व्हे ऑफ इंडिया ची इमारत लागली ती बाहेरून पाहत आम्ही  सितापुरा, प्रल्हादपुरा भागातून जयपूर रिंग रोड ओलांडून टोंक कोटा हायवे कडे निघालो. 

वाटेत 12 वाजता मालवा गावाजवळ एका पेट्रोल पंप जवळ थोडी रिफ्रेशमेन्ट घेऊन हायवेला लागलो. या रस्त्यावर फारच तुरळक वाहतूक होती. पण अनेक ठिकाणी दारूची दुकाने दिसत होती. राजस्थान मध्ये प्रामुख्याने गहू, बाजरी, ज्वारी, मका आदी रब्बी पिके प्रामुख्याने घेतली जातात. हायवेच्या दुतर्फा बाजरी, गव्हाची पिके जास्त करून दिसत होती. 

पुढे चाकसू च्या पुढे आल्यावर भूक लागली होती. शिवाय आज बरंच ऊन जाणवत होतं. आज जेवणाच्या बाबतीत देखील सकाळ प्रमाणे  गणित चुकले होते.  पण योग्य ढाबा मिळत नव्हता सारखी भुकेने आमच्या जीवाची तगमग होत होती. 2 ठिकाणी विचारले तर निव्वळ बार होते आणि स्नॅक्स पण आम्हाला राजस्थानी ढाबा जिथे चांगले शाकाहारी जेवण मिळेल ते आम्ही पाहत होतो. अशा परिस्थितीत पाटणकर सर अत्यंत संयम राखून होते. काय करणार या शोध मोहिमेत सायकलवरच आम्ही चिक्की खात 3 ते 4 उड्डाणपूल ओलांडून आणखी 13 किमी पुढे आलो. अखेर कोठून या गावा जवळ एक ढाबा सापडला. जवळपास 120 किमी नंतर लंच साठी  थांबलो. त्याला जेवण ऑर्डर केल्यावर त्याने लाल लाल अशी तर्री असलेली तिखट गट्याची भाजी आणि चपाती पण सोबत ताक मिळाल्याने अखेर कसे बसे जेवलो. 

पण इथे बरेच ट्रक ड्रायव्हर्स सोबत एड्स जनजागृती सायकल मोहीम पुढील रूट, चढ उतार विषयी चर्चा झाली. त्यांना सुरक्षित लैंगिक संबंध विषयी माहिती दिली. व एड्स चा प्रसार कारणे, उपचार आदीविषयी माहिती दिली. 

त्यात पाटणकर सरांनी त्याला कुतुहुल म्हणून कोटा नंतर घाट व रस्ता कसा आहे, चढ किती आहे आदी  विचारपूस केली. 

बाज वरच स्वतःला झोकून थोडा आराम करून आम्ही निघालो.  पुढे गुंन्सी ओलांडून निवाई बायपास ओलांडल्यावर टोंक 17 किमी बाकी होते. आणि अचानक सायकलचे चाक डुग डुग करायला लागले. आयला आता काही खरे नाही म्हणत मी सायकल बाजूला घेतली तर पाहतो काय " अरे रामा रामा पंचर ते पण नवीन ralson चे टायर व केंदा चे ट्यूब असून देखील  सायकल पंचर झाली. पंचर होणे काही नवीन अर्थात फार मोठी गोष्ट नाही पण इथे मी गोंधळून थोडी गडबड केली. पण इथे गुरू से शिष्य सकारात्मक चा अनुभव आला.  मागील टायर पंचर झाल्यावर मी उगाच चिडचिड केली ज्यामुळे 10 मिनिटं ऐवजी घाई केल्याने चाक खोलून ट्यूब बसवताना कधी नट विसर तर कधी वॉल ज्यामुळे अधिक वेळ लागत होता आणि उगाच चिडचिड करत होतो ज्यामुळे जोडायला 20 मिनिटे लागली. पण या वेळी पाटणकर सरांनी धीराने, शांतपणे पंचर जोडायचा मंत्र दिला. अर्थात इतका अनुभव असून आज शिष्य पाटणकर सरांचे बोल कामी आले. 

 पुन्हा नव्या दमाने सायकल हायवेला लागली. 

भौगोलिक दृष्ट्या देखील ही राईड नवीन अनुभव देतेय जसे पहिले 2 दिवस एक दम फ्लॅट तर दिल्लीत flyover, ट्रॅफिक तर जयपूर जवळ चढ उताराचे रिंग रोड, ट्रॅफिक, भर दुपारी हेड विंड चा सामना करत आजच्या राईड चा आनंद आम्ही घेतला.


पुढे एक चढ चढून आम्हाला बनस नदी लागली. पुढे बनस नदीवरील पूल ओलांडून टोंक शहरात प्रवेश केला. वाटेत एक बाईक वाल्याने काही अडचण भासल्यास नंबर दिला. तितक्यात कोटा येथील जी डी पटेल यांचा फोन की टोंक येथे अग्रवाल धर्मशाळा येथे श्री नरेंद्र विजय यांनी व्यवस्था केल्याचे सांगितले.  

अब सब अच्छा होगा म्हणत पंचर मुळे आलेली निराशा दूर होत गेली.  टोंक येथील भव्य कामानीने आमचे स्वागत केले. शहरात अनेक युवक आमच्या सायकल वरील बोर्ड वाचत आमच्या मोहिमेविषयी कुतूहल व्यक्त करत सेल्फी घेत होते. अखेर अग्रवाल धर्मशाळेत पोहोचलो. तिथे नरेंद्र विजय यांनी धर्मशाळेत येऊन आमची भेट घेऊन रात्रीच्या जेवणाची व रात्रीच्या मुक्कामाची सोय देखील केली होती.त्यांचे आभार मानून आम्ही स्नान वगैरे आटोपून आलेल्या टिफिन मधून पोटभर जेवलो. रूम अत्यंत साधी होती शिवाय थंडी बरीच होती आणि टॉयलेट बाथरूम देखील लांब होते. धर्मशाळेत उतरलेल्या बऱ्याच प्रवाशांनी  आमच्या मोहिमेविषयी जाणून घेऊन शुभेच्छा दिल्या. आज बराच थकल्याने आणखी काही लिहू शकलो नाही पण उद्याची व्यवस्था संदर्भात पुण्यातील उद्योगपती लाहोटी अंकल चा फोन की कोटा येथे माहेश्वरी रिसॉर्ट मध्ये तुमची उद्याची व्यवस्था केली आहे. चला कल अच्छा होगा म्हणत झोपी गेलो. 


डॉ पवन चांडक 

Friday, January 28, 2022

मानेसर भिवाडी कोटपुतली शाहपुरा (राजस्थान) एड्स जनजागृती सायकल यात्रा 165 km













 
मानेसर भिवाडी कोटपुतली शाहपुरा (राजस्थान) एड्स जनजागृती सायकल यात्रा 165 km - 16 November 2021

16 नोव्हेंबर च्या सकाळी वशिष्ठ भाई चा निरोप घेऊन जयपूर कडे निघालो. सकाळी सोबत सौरभ नेवगी 15 किमी अंतर पर्यंत कंपनी देण्यासाठी आला. वाटेत पंचगावो येथील धाब्यावर त्याने आम्हास कुलाडी चाय व क्रीम रोल खाऊ घातले. पुढे तो जंक्शन वर आमचा निरोप घेऊन परत गेला. आजचा दिवस जरा वेगळा होता. शिवाय अजूनही गारवा होता आणि सूर्यनारायण ने आम्हाला दर्शन दिले नव्हते. धुक्यात सायकलचे लाईट लावून सायकल चालवत होतो. वाटेत छोटे मोठे चढ होते आणि हा इंडस्ट्रीयल झोन असल्याने ट्रॅफिक खूप होती.  आम्ही आमेर रोड ने अर्थात दिल्ली जयपूर हायवे ने आमच्या लक्ष कडे सायकलिंग करत बिलासपूर, सिंधरावली, कापदीवास गावातून पास करत भिवाडी च्या पुढे आलो . पाटणकर सर फुल फॉर्म मध्ये सायकलिंग करत पुढे होते. जवळपास 40 किमी नंतर ते भेटले. 09:30 वाजता असलवास गाव जवळ 50 किमी सायकलिंग झाल्यावर एका धाब्यावर नाश्ता साठी थांबलो. गरमागरम आलू पराठे वर ताव मारला. थोडी स्त्रेचिंग करून पुन्हा मार्गस्थ झालो. शाहाजहानपुर बॉर्डर चेक पोस्ट पर्यंतचा पूर्ण रस्ता म्हणजे Industrial Corridor असल्याने सोनिपत पासून दिल्ली ते आज शाहाजहानपुर पर्यंत शेताचे दर्शनच नाही. जिकडे तिकडे फक्त फक्त कारखाने आणि इंडस्ट्रीज आणि प्रदूषण ....तितक्यात माझे मित्र विष्णुदास चापके यांचा फोन त्याने सायकल मोहीम, अडचणी विषयी विचारपुस करून काही अडचण आल्यास महत्वाच्या व्यक्तीचे नंबर पाठवले.  शाजापूर जवळ किसान आंदोलनचे टेंट असल्याने  एकेरी वाहतूक वळवली असल्याने सांभाळून सायकल चालवावी लागत होती तरी अचानक एखादी कार, गाडी जवळ येत होती. सांभाळून सायकल चालवत अखेर शाजापूर चेक पोस्ट ओलांडून राजस्थान मध्ये प्रवेश केला.
उन्ह वाढत चालले होते त्यामुळे पुढे Dehydration टाळण्यासाठी निमरणा जवळ एका धाब्यावर लस्सी घेतली. आता आमच्या सायकल मोहिमेतील चौथे राज्य राजस्थान तेथील माती, रस्त्याच्या दुतर्फा शेत तेथील शुद्ध हवा आणि सकाळ पेक्षा कमी झालेल्या ट्रॅफिक मुळे आनंद घेत पेडलिंग करायला मजा येत होती. सकाळपासून 110 किमी नंतर कोटपुतली येथे श्री गणेश राजस्थानी भोजनालय येथे दुपारच्या जेवणासाठी  थांबलो. गरमा गरम गेहू की रोटी, 3 वेगवेगळ्या भाज्या, कढी, दाल आणि Unlimited मठ्ठा चा आस्वाद घेऊन थोडा आराम करून मार्गस्थ झालो.
इथे धाब्यावर बरेच ट्रक ड्रायव्हर उपस्थित होते म्हणून मी स्वतः हुन त्यांच्या शी बाजवर बसून जेवतांना कुठून आले वगैरे विचारपूस करून गप्पांची सुरवात केली. ते दिल्ली, हरयाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश मधून आले होते. मग इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर आम्ही देखील आमच्या एड्स जनजागृती सायकल मोहिमेची आठवण करून देत त्यांना काही जनजागृती माहितीपत्रके दाखवत त्यांना मुळ विषयावर येऊन विचारलं  "आप घर से कितने दिन दूर रहते हो ? मेरा मतलब कभी इस सफर में किसींसे यौन संबंध आता है क्या ? तो आप सुरक्षित यौन संबंध हेतू क्या सावधानी बरतते हो ?  " आणि या संवादातून सुरक्षित लैंगिक संबंध दृष्टीने कंडोम च्या वापरासाठी त्यांना माहिती दिली तसेच वेळोवेळी लैंगिक संबंध नंतर जर काही त्रास झाल्यास गुप्तरोग तपासणी व एचआयव्ही टेस्टिंग करण्यासंदर्भात माहिती दिली.
पुढे आम्ही गोरधनपुरा, प्रागपूर मार्गे शहापूर कडे निघालो. 
वाटेत अचानक एक कार थांबली आणि त्या व्यक्तीने हातमिळवून आमचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. त्याची ओळख करून देताना तो म्हणाला जवळच त्याचे फार्म हाऊस असून तो वैज्ञानिक असून त्याने देखील जयपूर ते स्टॅच्यु ऑफ युनिटी अशी सायकल मोहीम केल्याचे म्हणाला. आमच्याच बिरादरी अर्थात सायकलिस्ट जमातीचा भेटल्याने आनंद झाला. काही अडचण आल्यास त्याने त्याचा नंबर दिला. त्याचा निरोप घेऊन मार्गस्थ झालो.
145 किमी सायकलिंग नंतर चहा ब्रेक साठी थांबलो व शाहपुरा येथे काही राहण्यासाठी व्यवस्था आहे का विचारपूस केली. परंतु तिथे मंदिर, धर्मशाळा किंवा डाकबंगला काहीच नाही. माझ्याकडे काही राजस्थान मधील फोन होते त्यांना पण कॉल करून पाहिले पण काही उपयोग नाही. कारण शाहपुर outskirt असल्याने तिथे धर्मशाळा, डार्क बंगला नाही. चलो जो होगा देखा जायेगा म्हणत आम्ही चहा घेऊन ताजेतवाने होऊन निघालो. पुढे छोटासा चढ लागला मग आम्ही लगेच गेअर बदलत  तो चढ आरामात चढल्यावर पाहतो काय मावळतीला सूर्य जणू आम्हाला आशीर्वाद देत होता.
जसा सूर्य मावळला तसा पांढऱ्या रंगाचे ऊन सोनेरी रंगात बदलले, सोनेरीचे शेंदरी आणि आता शेंदरीचे गुलाबी। आणि मावळतीला सूर्य आम्हाला म्हणाला
"वारे माझ्या लेकरांनो आजची राईड तुम्ही खूप खासच मारली.
जशी विश्वचषक च्या अंतिम सामन्यात धोनी ने श्रीलंका विरुध्द शानदार इनिंग खेळला होता. "
शहापूर हे गाव डोंगरात वसले असून इथे ऐतिहासिक वास्तू शहापूर हवेली प्रसिद्ध आहे. ती राजपूत शेखावत यांची राजधानी होती.  शहापुर हे जयपूर जिल्ह्यातील नगर परिषद असलेले गाव आहे.
अब सब अच्छा होता म्हणत शाहपुरा गावातून पेडलिंग करत आरामात गावाबाहेर आलो. पुढे कृष्णा लॉज येथे रूम साठी विचारले  तर 800/- रुपये पासून बार्गनिंग करत 500/- मध्ये ठरवून रूम पक्की केली. मस्त गरम पाण्याने अंघोळ करून रात्री पोटभर जेवण करून मागील 2 दिवसातील कपडे धुवुन लवकर झोपी गेलो. गावाबाहेर हॉटेल शिवाय डोंगराळ भाग असल्याने कडाक्याची थंडी होती त्यामुळे वॉर्मर आणि जॅकेट, माकडटोपी घालून झोपावे लागले.
165 किमी सायकलिंग मुळे झोप छान लागली.

डॉ पवन चांडक