एड्स जनजागृती सायकल यात्रा : वाघा आटारी बॉर्डर - अमृतसर - जालंधर - फगवाडा १३० किमी
12 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजता छेहारता गुरुद्वारा चे दर्शन घेऊन चहा ब्रेड चा प्रसाद घेऊन गोल्डन टेम्पल ला पोहोचलो.
१६ व्या शतकापासून अमृतसर हे शीख समुदायाचे मुख्य धार्मिक स्थान राहिले आहे. येथील सुवर्णमंदिर हे 'अमृत तलावा'च्या काठी आहे. हरमंदिर साहेब, दरबार साहेब, हरिमंदिर इ. नावांनीही त्याचा उल्लेख होतो. शिखांचा पवित्र ग्रंथ ‘गुरु ग्रंथसाहिब’ पहिल्यांदा या मंदिरात ठेवला गेला. त्यामुळे या मंदिराला शीख धर्मपीठाचे महत्त्व प्राप्त झाले.
अर्जुनदेव यांनी १५८८–१६०७ दरम्यान त्याचे बांधकाम पूर्ण केले. त्याचा अभिकल्प अर्जुनदेव यांनी शीख धर्मातील प्रतीके व संकल्पना यांनी परिपूर्ण बनविला. त्याची वास्तू चौरस असून सांडवा किंवा साकवावरुन मंदिरात प्रवेश करावा लागतो. मूळ वास्तू दुमजली व त्यावर घुमट असावा. तिचे मातीच्या विटेचे बांधकाम सुबक होते. मंदिराच्या उभारणीत भव्यतेपेक्षा साधेपणावर विशेष भर दिला आहे. मंदिराला चारही बाजूंनी प्रवेशद्वारे असून सर्व जाति-धर्मांच्या स्त्री-पुरुषांना ते खुले आहे. येथील तलावाला ‘अमृत सरोवर’ आणि त्या भोवतीच्या शहराला अमृतसर म्हणतात. अमृतसर अर्जुनदेवांनी वसविले.
सुवर्ण मंदिर येथे पोहोचून सूर्याच्या पहिल्या किरण सोबत लाईन मध्ये लागून दर्शन घेतले. अत्यंत शिस्तीत लाईन मध्ये लागून गुरुग्रंथ साहेब पुढे डोके टेकवून सायकल मोहिमेच्या यशासाठी व सुरक्षित प्रवासासाठी आशीर्वाद घेऊन लंगर प्रसाद घेऊन आम्ही रेल्वे स्टेशन पोहोचलो. स्टेशनवर डॉ पी एस रानु यांनी आमचे स्वागत केले. डॉ रानु हे एके काळी पंजाब होमिओपॅथिक परिषद चे अध्यक्ष होते व केंद्रीय होमिओपॅथिक परिषद चे सदस्य तर सध्या सहस्त्रधारी शीख पार्टीचे अध्यक्ष आहेत. शिवाय त्यांना पंजाब पोलिस ची विशेष सुरक्षा आहे. आमच्या सायकल 9 वाजता मिळाल्या. सुदैवाने रेल्वेचे आभार मानायला पाहिजे. कारण त्या व्यवस्थित पोहोचल्या होत्या. कागदोपत्री फॉर्मलीटी आटोपून आम्ही वाघा अट्टारी बॉर्डर पोहोचलो. तर पाहतो काय, बॉर्डर चेक पोस्ट वर डॉ रानु यांनी आमच्या फ्लॅग ऑफ ची तयारी केली होती. पहिल्यांदा भारत पाकिस्तान बॉर्डर जवळून पाहण्याचे स्वप्न साकार झाले. कळत नकळत हे दृश्य पाहून मनात रोमा रोमात भारत माता की जय, वंदे मातरम आदी जय घोषाने वातावरण देशभक्तीमय झाले होते. तिथे बरेच पर्यटक, महाराष्ट्रातील पर्यटक येऊन आम्हास शुभेच्छा देत होते. अनेक पत्रकार हिंदी, पंजाबीत आम्हाला प्रश्न विचारून मुलाखत घेत होते.
उद्देश एकच ‘आझादी का अमृतमहोत्सवी’ वर्ष निमित्त सर्वसामान्य नागरिकांमध्ये एचआयव्ही एड्स जनजागृती, बेटी बचाओ बेटी पढाओ, स्टॉप ड्रग, नशा विरोधी आदी संवादातून जनजागृती व आजवर एचआयव्ही ग्रस्त या अनाथ बालकांच्या मूलभूत प्रश्नावर सुरू असलेले कार्य व सायकल मोहीम च्या उद्देश व मार्ग विषयी संवाद साधत होते. 11 वाजले आणि अखेर ती वेळ आली. बी एस एफ चे कमाडींग ऑफिसर नायर यांनी आमच्या सायकल मोहिमेस हिरवा झेंडा फडकावून शुभेच्छा दिल्या.
जो बोले सो निहाल सश्रीयकाल
भारत माता की जय
वंदे मातरम आदी जयघोषाने आमच्या सायकल मोहिमेची सुरवात झाली.
ग्रँड ट्रंक रोड वरून मी आणि पाटणकर सर मस्त पेडल मारत सकाळची थंडी आता बरीच कमी झाल्याने स्वेटर्स उतरवून आम्ही टी शर्टवर निघालो.
या वेळी मला बॉलिवूड मधील गाणे सुचले
अरे शान्ति मार रहा संसार
अब तू आने दे ललकार
तेरी तो बाहें पतवार
कदम हैं तेरे हाहाकार
तेरी नस नस लोहा तर
तू है आग मिल्खा
रे बस तू भाग मिल्खा।।
दोन्ही बाजूला गहू, मक्का ने बहरलेली शेते आणि वाहणारा मंद आणि गार वाऱ्याचा आस्वाद घेत मध्येच चुकीच्या बाजूने येणारे वाहन ट्रॅक्टर चुकवत आम्ही गोल्डन गेट अमृतसर पोहोचलो. इथून जालंधर कडे जाण्यासाठी एक बायपास जातो तर दुसरा अमृतसर शहरातून पण आम्ही लोकांशी संवाद साधता यावा म्हणून अमृतसर शहरातून निघालो. रस्ता मोठा होता तरी ट्रॅफिक खूप असल्याने मी आणि पाटणकर सर अत्यंत सावधपणे सायकल चालवत अमृतसर शहर पाहत सायकलिंग करत निघालो. आमच्या सायकल हँडल वरील फडकणारा तिरंगा आणि एड्स जनजागृती बोर्ड मुळे ठिक ठिकाणी लोक थांबून आमच्या सायकल मोहीम व उद्देश विषयी विचारपूस करून शुभेच्छा देत होते. पंजाबी वयोवृद्ध लोक डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देत होते. वाटेत खालसा कॉलेज समोर अनेक विद्यार्थी मित्रांनी आमच्या व सायकल सोबत सेल्फी घेतल्या. अमृतसर बस अड्डा हुन उड्डाण पूल चढत आम्ही मेन रोड पकडला. या रस्त्यावर सुसाट वेगाने वाहने वाहत होती. अखेर 1 तास ट्रॅफिक मधून मार्ग काढल्यावर अमृतसर शहराच्या बाहेर पडलो. भूक लागली होती. रस्त्यावर थोडी केळी विकत घेऊन नाश्ता केला. इथून जालंधर हायवे रस्त्याने निघालो. तितक्यात डॉ रानु सरांचा फोन की पुढील ‘मनवाला’ गावा जवळ एक टोल प्लाझा नंतर ‘Take Away’ Restaurant लागेल. तिथे डॉ अनुविंदर कौर रंधवा व ते काम करत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र तर्फे आपला सत्कार ठेवला आहे. आम्ही अर्धा तास नंतर तिथे पोहोचलो. त्या PHC तील कर्मचारी मित्रांनी आमचे आदरातिथ्य करून आम्हाला पोटभर जेऊ घातले. वाटेत एक ‘परम’ नावाचा पत्रकार मित्र भेटला. त्याने आमच्या संपूर्ण सायकल मोहीम विषयी एका पंजाबी चॅनल साठी मुलाखत घेतली. दुपारचे 1 वाजले होते. आम्ही वेळ न घालवता पुढे निघालो. जवळपास 15 किमी पुढे आलो नसेल तर तितक्यात ‘धडाम’ असा स्फोट सारखा आवाज झाला. तर पाहतो काय ? आमच्या पाठी मागे असलेल्या ट्रक चे समोरचे टायर फुटून त्याचे अवशेष माझ्या सायकलच्या ही पुढे उडून पडले होते. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही व तो ट्रक जागेवरच थांबला………
पण काही मिनिटे आमच्या छातीत धडधड होऊ लागली. थोडे पाणी पिऊन आम्ही निघालो.
वाटेत ‘बियास नदी’ ओलांडून ब्यास शहर च्या थोड्या पुढे आलो.
बियास ही उत्तर भारतामधील प्रमुख नदी आहे. बियास (व्यास) नदी हिमाचल प्रदेशाच्या कुलु जिल्ह्यात उगम पावते व सुमारे ४७० किमी वाहत जाऊन पंजाब राज्यात सतलज नदीला मिळते.
‘राव्या’ गावाच्या थोडे पुढे आल्यावर ‘ब्यास नदी’ वरील विशाल पूल ओलांडून आम्ही ‘संग्रावन’ शहर ओलांडले.
पुढे वाटेत कर्तारपूर येथील ‘जंग ए आझादी’ मेमोरियल लागले.
पुढे कर्तारपूर जवळ एका उड्डाणपूल वर डॉ रानु व त्या गावातील शेतकरी आमच्या स्वागत साठी उभे होते.
त्यांनी स्वागत करून एका प्लेट मध्ये आमचे जेवण वाढले. हायवेला कडेला फुटपाथ वर उभे राहून आम्ही पुलाव, चपाती, दाल मखणी आणि सलाड आदी पोटभर जेवण जेवलो. ते जेवण खूपच रुचकर होते. कदाचित त्यांचे प्रेमच इतके होते की साधे जेवण देखील पंच पक्वान्न पेक्ष्या देखील गोड लागत होते.
तितक्यात ‘जालंधर पोलीस’ ची गाडी आली. आम्हाला वाटले काय झाले की ? आम्ही काय केले ?
की हे पोलीस अचानक समोर येऊन उभे राहिले ?
मग त्या पोलीस इन्स्पेक्टर ने पुष्पगुच्छ देऊन आमचे स्वागत केले. तो म्हणाला तुमचा इमेल DIG साहेबांना मिळाल्यावर त्यांनी आम्हाला तुमच्या स्वागत साठी सांगितले होते. चला प्रशासन इमेलची दखल घेतात……
सायंकाळ चे 4:45 वाजले होते. आता वेळ न घालवता आम्ही निघालो. सकाळ पासून 80 किमी झाले होते. पुढे जालंधर बायपास जवळ ‘बिधीपूर’ येथे ‘डॉ ललित ओम’ व ‘डॉ रश्मी घई’ यांचे हॉस्पिटल होते. ते त्या पंचक्रोशीतील प्रसिद्ध डॉक्टर आहेत. डॉ ललित होमिओपॅथिक डॉक्टर तर त्यांच्या पत्नी डॉ रश्मी ह्या आयुर्वेदिक डॉक्टर. डॉ रानु व डॉ ललित कॉलेजमध्ये एकमेकांचे वर्गमित्र होते. आजही त्यांची मैत्री कायम आहे. त्याच्या हॉस्पिटलच्या सर्व स्टाफ ने आमचे स्वागत केले. डॉ रश्मी यांनी प्रेमाने त्यांच्या हाताने बनवलेले ‘पनीर पकोडे’ व ‘गरम समोसे’ खाऊ घातले. आपल्या देशातील पण इतक्या लांबच्या अनोळखी राज्यात अस्सल पंजाबी पाहुणचार पाहून आम्ही भारावून गेलो. डॉ रश्मी यांना आमच्या कार्याविषयी व सायकल मोहिमेविषयी बरेच जाणून घ्यायची इच्छा असल्याने, त्यांच्याशी सायकलिंगची आवड, एड्स जनजागृती व पुनर्वसनविषयक कार्य आदीविषयी माहिती दिली. त्यांनी उद्या त्यांचे वडील ज्यांना वयाच्या 80 व्या वर्षी देखील सायकलिंग ची आवड असून ते विख्यात गणित तज्ञ असून त्यांना ‘राजपुरा’ येथे भेटण्यासाठी विनंती केली. सायंकाळी 6 वाजले उशीर होत असल्याने त्यांचा निरोप घेऊन निघालो. जालंधर ऐवजी थोडे पुढे मुक्काम करावे म्हणून आम्ही जालंधर बायपास ने निघालो.
जालंधर हे सर्वात जुने शहर व एक मोठे औद्योगिक शहर असून येथील मुख्य उत्पादने चामडे, खेळ व हाताची साधने आहेत. जालंधरमध्ये बरीच मंदिरे, गुरुद्वार, किल्ले आणि संग्रहालये आहेत.
नाथ इतिहास संदर्भ: भारतात नाथांच्या नावाने बरीच तीर्थक्षेत्र आहेत. जालंधर जिल्ह्याचे नाव भगवान आदिनाथ यानिकी शिव यांचे शिष्य जालंधर नाथ यांच्या नावावर आहे. काही जणांचा असा विश्वास आहे की ‘जालंधर’ म्हणजे पाण्याखाली आणि येथे सतलज आणि बियास नद्यांचा संगम आहे, म्हणून त्या जागेला जालंधर असे नाव देण्यात आले.
अंधार लवकरच पडला होता. 06:30 वाजता पाटणकर सरांचा सायकलचा लाईट डिस्चार्ज झाल्याने पुढे कसे जायची चिंता होती. शिवाय 100 किमी सकाळपासून झाले होते. मग मी त्यांना दिलासा देऊन one by one एका मागे एक निघालो. वाटेत बरेच junction होते जसे एक पठाणकोट, जम्मू कडे तर उजव्या बाजूला विशाल पसरलेले जालंधर शहर. बरेच मोठे शहर असून वाटेत बरेच मोठे मोठे हॉटेल, मंगल कार्यालय, गुरुद्वारा, मंदिर पाहत आम्ही सांभाळून सायकल चालवत होतो. कारण ‘नजर हटी दुर्घटना घटी’ कारण लेन कटिंग वर इंडिकेटर दाखवायची शिस्तच नव्हती. त्यामुळे जीव मुठीत घेऊन सायकल चालवत होतो.
जालंधर मागे सोडून आम्ही फगवाडा कडे निघालो. 8 वाजताच्या आसपास लायटिंग ने चमकत असलेले फगवाडा शहर लागले. जवळपास सकाळपासून 11 वाजता निघालेलो आम्ही अमृतसर, जालंधर हे जिल्हे ओलांडून 130 किमी सायकलिंग करून फगवाडा पोहोचलो. तितक्यात डॉ मिट्टू गोयल यांचा फोन आला की, हनुमान मंदिर येथे तुमची राहण्याची सोय केली आहे. पुढे उड्डाणपूल जवळ डॉ मिट्टू उभे होते. ते हनुमान मंदिर येथे घेऊन गेले व आमच्या राहण्यासाठी छान खोलीत आमची सोय करून मार्केट रोड वर एका ‘ठेला’ वर ‘राजमा चावल व तंदूर रोटी’चे जेवण जेऊ घातले. त्या रुचकर जेवणावर मी आणि पाटणकर सरांनी मिटक्या मारत आस्वाद घेऊन डॉ मिट्टू सरांच्या आदरातिथ्य बद्दल आभार मानून निरोप घेऊन झोपी गेलो.

No comments:
Post a Comment