२८ नोव्हेंबर : मंचर महड पाली १६५ किमी
रात्रीची
छान झोप झाल्यामुळे सकाळी पावणे पाचला उठून आवराअवरी करून 05:36 ला
सायकलवर सामान बांधून मंचर हुन निघालो। आजचा मुक्काम महड किंवा पाली
त्यादृष्टीने लवकर सायकलिंग सुरवात करत 5 किमी नंतर हायवेला लागलो। थोडा
चहा बिस्कीट घेतल्यावर सायकलच्या हेड लाईट च्या उजेडात सावधपणे सायकल चालवत पेठ जवळ एक थोडा चढ लागला तो चढून पुन्हा थोडा उतार मग खेडा घाट टॉप ला ज्ञानेश्वर माऊली समाधी मंदिरला जाणाऱ्या पालखीचे दर्शन घेऊन खेडा घाट
उतरणे सुरू केले। दिवस उजडल्याने सभोवतालचे दृश्य नयनरम्य होते। अडीच किमी
खेडा घाट उतरून राजगुरूनगर मध्ये प्रवेश केला। बस स्थानक जवळ हुतात्मा
राजगुरू स्मारक चा कुठे बोर्ड दिसतो का पाहू लागलो पण न भेटल्याने पुढे
भीमा नदीवरील पूल ओलांडून पुढे आलो. तितक्यात हुतात्मा राजगुरू स्मारक चा
बोर्ड दिसला मग परत त्या दिशेने विचारत गल्ली बोळ्यातून हुतात्मा राजगुरू
स्मारक चे दर्शन घेण्यास पोहोचलो। भीमा नदीच्या काठावर राजगुरू वाडा आहे
तिथेच हे स्मारक उभारले आहे। तिथे राजगुरूंच्या जन्मस्थळ, जन्मखोली व
त्यांच्या जीवनावरील विविध पोस्टर लावले होते ते बाहेरूनच पाहून निघावे लागले। सकाळी
10 वाजता हे स्मारक उघडते तरी 07:30 ला त्यांनी बाहेरून पाहण्याची अनुमती
दिल्याने या पावन भूमीचे दर्शन घेऊ शकलो। गल्लीतून फिरतांना अनेकांचे सायकल
मोहिमविषयी विविध प्रश्न आणि उत्तरे असा संवाद सुरू होता। पुन्हा हायवेला
लागून सहज चाकण पोहोचलो। इथून एक रोड तळेगाव कडे जातो म्हणून माहीत
नसल्याने मी तसाच पुढे पुण्याकडे जात राहिलो। पुढे मोशी गाव लागल्यावर
रस्ता चुकल्याची शंका आली मग लोकांना विचारत आकुर्डी मार्गे देहू पोहोचलो।
मी मनात म्हटले बरे झाले रस्ता चुकलो ते निदान संत तुकाराम महाराजांच्या
वैकुंठस्थान मंदिरास माथा टेकवूया! गर्दी नव्हती आधी इंद्रायणी नदी काठी
वसलेले विठ्ठल रुकमाई मुख्य मंदिर व तुकाराम महाराज जन्मस्थळ चे दर्शन घेऊन
संत तुकाराम महाराज वैकुंठस्थान मंदिर येथे माथा टेकवून आशीर्वाद घेतला।
आता भूक लागली होती पण विचार केला आधी हायवेला लागू म्हणून देहू रोड ऐवजी
तळेगाव मार्गे लागू या उद्देशाने भंडारा हिल जवळ चाकण - तळेगाव हायवेला
लागलो। तिथे हॉटेल भंडारा येथे मस्त पोटभर मिसळ पाववर ताव मारून पाणी भरून
निघालो। तळेगाव पर्यंत रस्ता गजबजलेला, मध्यम वाहतूक व चढ उतार असलेले
रस्ते 10 किमी नंतर पुणे मुंबई NH4 हायवेला लागलो। इथून काळजीपूर्वक चालवणे
आवश्यक होते कारण प्रचंड वाहतूक, वेगाने चालणारी वाहने म्हणून बरोबर
डाव्या साईड ने पेंडलिंग मध्ये एक लय ठेवत वडगाव मार्गे कामशेत पोहोचलो।
पुढे थोडा 1 किमी लांब चढ लागला तो चढून लोणावळा च्या दिशेने निघालो। इथून
एकीकडे डोंगर रांगा दुसरीकडे रेल्वे ट्रॅक व डावीकडे एक्सप्रेस हायवे असं
छान दृश्य दिसते। पाण्याचे छोटे छोटे हायड्रेशन ब्रेक सुरू होते। वाटेत वेट
n जॉय वाटरपार्क, विविध रिसॉर्ट्स, कार्ला मार्गे निसर्गरम्य ठिकाण
लोणावळात प्रवेश केला। इथे मात्र विविध पर्यटक, स्थानिक, ऑटोवाले सायकलवरील बोर्ड
वाचून चौकशी करत होते। येथील प्रसिद्ध लोणावळा चिक्की घेऊन पुढे छान
प्रसिद्ध असा तंदुरी चहा घेऊन खंडाळा च्या दिशेने निघालो। वाटेत खंडाळा लेक
पाहून थोडा चढ चढून खंडाळा घाट टॉप ला पोहोचलो। इथे विविध सनसेट पॉईंट व
व्ह्यूव पॉईंट आहेत। इथून एकीकडे लांब पसरलेल्या सह्याद्रीच्या डोंगर रांगा तर दुसरीकडे
एक्सप्रेस हायवे, बोगदे असे छान दृश्य दिसते। थोडा निवांत वेळ घालवत या
निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत भोर घाट आरामात उतरणे सुरू केले। वाटेत बरीच
मंदिर आहेत। बाहेरून एकवीरा आई मंदिराचे दर्शन घेत तीव्र उतारावर सांभाळून
सायकल चालवत भोर घाट उतरू लागलो। 8 किमी उतार नंतर खोपोली गावात प्रवेश
केला। उतारावर मजा आली पण मनात विचार केला की उद्या आपल्याला याची परतफेड
करायची आहे हा घाट चढून। बरोबर रस्ता विचारत खोपोली हुन महड रोड ला लागलो। 1
वाजता महड येथील अष्टविनायक पैकी एक वरद विनायक मंदिर पोहोचलो। माझा हा
7वा अष्टविनायक गणपती त्याचे दर्शन घेण्यासाठी रांगेत लागलो। विशेष गर्दी
नव्हती। छान चरण दर्शन झाले। बाजूला सुंदर कुंड आहे।
दर्शन
घेऊन नीरा पिऊन अलिबाग येथील अधिकारि श्री जयवंत गायकवाड सरांना फोन केला।
त्यांनी 3 वाजता पंचायत समिती खालापूर येथे कार्यक्रम ठेवला होता। मग
आरामात खालापूर येथील विश्रामगृह येथे पोहोचून जेवण वगैरे आटोपून 3
वाजल्याची वाट पहात असतांना फेसबुकवरील पोस्ट पाहून परभणी येथील आमच्या वाहिनी सौ रिपल मितेश शहा यांचा फोन की खालापूर त्यांचे माहेर आहे प्लिज
घरी जा। पण वेळेची मर्यादा असल्याने त्यांना नकार दिल्याने त्यांचे भाऊ
गोपाल शहा भेटण्यास आले त्यांना भेटून खूप आनंद झाला। गोपाल शहा हे मूळचे
खालापूर निवासी त्यांचे येथे किराणा दुकान व कोका कोला ची एजन्सी असे
नामवंत व्यवसायिक पण त्यांच्या बोलन्यात अत्यंत साधेपणा व मनमिळाऊ
स्वभावाचे असे. त्यांना उद्या जेवायला येण्याचे आश्वासन देऊन निरोप घेऊन
पंचायत समिती खालापूर येथे पोहोचलो। तिथे बीडीओ साहेबांच्या हस्ते माझा
सत्कार करण्यात आला। या प्रसंगी गटविकास अधिकारी श्री संजय भोये, जिल्हा
कार्यक्रम व्यवस्थापक श्री जयवंत गायकवाड, विस्तार अधिकारी श्री भालेराव
मॅडम, दत्तात्रय नाईक व महिला बचत गट च्या सदस्य उपस्थित होत्या। या
प्रसंगी मी एचआयव्ही एड्स विषयी माहिती देतांना त्याविषयी आलेल्या विविध
गैरसमज मुळे एचआयव्ही बाधित बालके त्यांच्या मुलभुत हक्कांपासून वंचित
राहतात। म्हणून त्यांचे मूलभूत हक्क शिक्षण आरोग्य व पुनर्वसन या
प्रश्नावर परिपूर्ण आशा उपाययोजनेची गरज आहे म्हणून या प्रश्नांवर
संवादातून जनजागृती व्हावी म्हणून मी विविध सायकल मोहिमेतून जनजागृती करत
असल्याचे म्हणालो। उपस्थितांच्या शुभेच्छा घेऊन निरोप घेतला।
पावणे चार
वाजले होते। पुढे एक चढ चढून पाली फाट्याला लागलो। इथून खरी परीक्षा होती।
कारण पाली ते दिघी जेट्टी हा रहदारीचा रस्तावर सिमेंट रोडच्या कामामुळे
ठिकठिकाणी खोद काम केलेले होते। सावकाश खड्डे चुकवत सायकल चालविल्यामुळे
वेग मंदावला होता। ऍडलॅब इमॅजिका चौकात ताक पिऊन निघालो। पुढे रस्ता चढ
उतार व रस्ता खराब असल्याने उताराचा फायदा होत नव्हता पण दोन्ही बाजूला
जंगल त्यामुळे सायकल चालवताना उत्साह होता। सकाळ पासून 130 किमी होऊन देखील
थकवा नव्हता। उंबरे, दुरशेत नानोसे गाव गेले परळी ला पोहोचलो। उंबरे इथून
उबरखिंड छावणीकडे साठी रस्ता फुटतो । उंबरखेड छावणीत निवडक मावळ्यांनी
गनिमी कावा पद्धतीने लढा देत ही खिंड लढवून मुघल फौजांना नाकी नऊ आणले होते
असा इतिहास आहे। तर दुरशेत चे नाव मी ड्युइथलॉन साठी ऐकले आहे। इथून केवळ
17 किमी बाकी पण सायंकाळचे 05:45 झाले होते। इथे थोडे पायात गोळे आल्यासारखे वाटू लागले
म्हणून चहा व मोनाको बिस्किट घेतले। इथे अनेक जणांनी अष्टविनायक मोहीम
विषयी चौकशी केली। चहा मुळे मला देखील थोडा उत्साह व 4 थ्या दिवशीच
अष्टविनायक यात्रा पूर्ण होणार म्हणून आनंद असल्याने तितक्याच उत्साहाने
उत्तरे देत होतो। मला वाटले आता खराब रस्ता संपला आणि पाली 8 किमी बाकी असताना अंदाज
चुकला. एक साईडने रोड खोदून ठेवल्याने संपूर्ण धुरळामुळे आणि येणारे वाहने
कर्णकर्कश हॉर्न वाजवून खाली उतरण्यास मजबूर करत होते अखेर आता माझी सटकली
होती....
सायकल साईड ला घेऊन तोंडावर मास्क आणि
डोळ्यावर गॉगल चढवून धुळीच्या साम्राज्यात लढत धुरळा उडवणार्या वाहनातून
सावध मार्ग काढण्यास तयार होऊन निघालो। ७ किमी च्या या धुळीच्या ऑफ रोडवर सायकल चालवताना मला युद्धभूमीवर घोडा चालवल्यासारखे वाटले अखेर आमच्या लढाऊ बाण्यापुढे
रस्त्याने शरणागती पत्करली आणि 7 किमी नंतर आमची स्वारी अष्टविनायक पाली
गावात दाखल झाली।
पाली येथे माझे तरुणाईच्या वेगळ्या
वाटा (गेवराई 2014) मध्ये भेट झालेले फेसबुक मित्र व शिवम प्रतिष्ठान व
सृजन यात्रेनिमित्त महाराष्ट्रातील सामाजिक संस्थांना जोडणारे प्रमोद जाधव व
दापोली येथे बीडीओ म्हणून कार्यरत असलेली त्यांची पत्नी सुवर्णा बागल
यांनी शासकीय विश्रामगृह येथे व्यवस्था केली होती। मी फ्रेश होऊन
बल्लाळेश्वर अष्टविनायक गणपती मंदिर पाली येथे दर्शनास पोहोचलो।
बल्लाळेश्वर गणपतीचे दर्शन घेऊन प्रसाद घेतांना तेथील देवस्थान समितीने
माझे अष्टविनायक पूर्ण झाल्याबद्दल स्वागत करून परतीच्या प्रवासासाठी
शुभेच्छा दिल्या। दर्शन घेऊन कुंड येथील विविध रंगांची उधळण करणाऱ्या
तुषारांचा आनंद घेत मागील 4 दिवसांचा मागोवा घेत बसलो होतो। थोड्या वेळाने
थोडं कोकम शरबत घेऊन घरी 8वे अष्टविनायक पूर्ण केल्याचा निरोप देऊन शासकीय
विश्रामगृह येथे पोहोचलो तर पाहतो काय माझे मित्र प्रमोद जाधव खास माणगाव
हुन मला भेटण्यासाठी आले होते। त्यांच्याशी त्यांच्या लग्नात त्यांनी
केलेल्या पुस्तकरूपी आहेर पासून सृजन यात्रेतून सामाजिक संस्थांच्या भेटी
ते शिवम प्रतिष्ठान कराड आशा विविध मुद्यांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या।
रात्रीचे जेवण करून मग केंव्हा झोप लागली ते कळाले नाही।



















No comments:
Post a Comment