26/11/18: पाटस सिद्धटेक रांजणगाव 111 km
सायकलवरून जनजागृती कशी शक्य आहे हा अनेकांचा प्रश्न ? मला याच प्रश्नास उत्तर म्हणून एक प्रतिप्रश्न विचारावा वाटतो, आजवर शासन पातळीवर टीव्ही, वर्तमानपत्र, रोड शो, रेड रिबन एक्सप्रेस च्या माध्यमातून इतकी जनजागृती झाली. तरी आजही नारळ पानी अथवा कोका कोला पिऊ नका त्यात एचआयव्ही रक्त मिश्रित आहे। परभणी येथे जीवनरेखा बालगृहात मुले होती तेंव्हा देखील असाच परिसरातील लोकांमध्ये गैरसमज होता की इथे हे बालगृह नकोय कारण तर डास चावल्यामुळे एचआयव्ही चा प्रसार होईल ....
म्हणजे आजही समाजात असे अनेक गैरसमज आहेत जे केवळ संवादातूनच दूर होणे शक्य आहे आणि त्यासाठी सायकलवारी जगात लय भारी
पाटस येथे जगताप सरांकडे रात्री छान झोप लागली होती। पहाटे लवकर आवरून जगताप वहिनींनी केलेला सुमधुर असा काळा चहा घेऊन त्यांचा निरोप घेऊन 06:30 ला निघालो। हायवेला थोडे पुढे गेल्यावर टोलनाका ओलांडून डावीकडे दौंड च्या दिशेने लागलो। या भागात उसाचे उत्पादन भरपूर आहे शिवाय साखर कारखाने बरेच असल्याने ठिकठिकाणी उसाने भरलेले ट्रक भेटत होते। पण इथून रस्ता बराच खराब होता। शिवाय कालच्या खराब रोड मुळे मागील चाकात थोडे आऊट आले होते। तरी तसेच पायडल मारत 07:30 ला भीमा रेल्वे उड्डाण पूल ओलांडून दौंड शहरात प्रवेश केला। दौंड हे पुणे नगर च्या सीमेवरील तालुका। दौंड हे फार मोठे रेल्वे जंक्शन असून इथून सोलापूर दक्षिण भारत तर मनमाड दिल्ली व पुणे बारामती असा रूट फुटतो। सिद्धटेक चा रोड विचारून निघालो तर वाटेत शाळकरी मुलांची लगबग दिसत होती बहुतेक 26 पासून दिवाळी सुट्टीनंतर शाळा सुरू होणार होत्या। स्टेशन, स्मशान भूमी ओलांडून सिद्धटेक रोड वर 10 किमी पुढे आलो असेल भूक लागली होती लगेच एक चहाची टपरी गाठून मस्त क्रीम बिस्कीट आणि चहा घेऊन निघालो। थोडं पुढे गेलो असेल तर ओ साहेब थांबा थांबा म्हनुन कोणी आवाज देत होते। थोडं थांबून पाहतो तर 50 वर्षाचा एक व्यक्ती जवळ येऊन मोरया म्हणत नमस्कार घातला। बोर्ड वाचून त्याला माझ्या सायकल मोहीम विषयी अंदाज येऊन म्हणाला मी 'राजेंद्र बुब' दौंड येथील रहिवासी आजवर शास्त्रोक्त पद्धतीने 12 वेळेस पायी अष्टविनायक यात्रा केलीय। मी लगेच त्यांना साष्टांग नामस्कारच घातला। आयला इथे एकदा निघालो तर सरकार आणि बांधकाम विभागाच्या नावाने खडे फोडायलो आणि हा व्यक्ती 12 वेळा यात्रा केलीय। त्यांनी सर्व रूट बद्दल मुखपाट असल्यासारखे माहिती दिली आणि आशीर्वाद देऊन काहीही अडचण असल्यास कॉल करा म्हणून निरोप घेऊन निघालो। पुढे देऊळगाव मार्गे सायकल चालवत खड्डे चुकवत भीमा नदीच्या पुलावर आलो मस्त फोटोसेशन करून सिद्धटेक तिसरा अष्टविनायक ला पोहोचलो। आज चतुर्थी असल्याने बरीच गर्दी होती। गर्दीतून मार्ग काढत प्रवेश द्वाराजवळ एका टपरीवाले काकांची परवानगी घेत सायकल पार्क केली। गर्दी होती तरी लगेच दर्शन झाले।
सिद्धटेक (सिद्धिविनायक) हे अहमदनगर जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. पेशवेकालीन महत्त्व लाभलेल्या ह्या सिद्धिविनायकाच्या मंदिराचा गाभारा
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधला. छोट्याश्या टेकडीवर असलेल्या या देवळाचा रस्ता पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी तयार केला. मात्र, १५ फूट उंचीचे व १० फूट लांबीचे हे देऊळ अहिल्याबाई होळकर यांनी बांधले. . या मंदिराच्या जवळून भीमा नदी वाहते.
मंदिरातील सिद्धिविनायकाची मूर्ती स्वयंभू असून ती तीन फूट उंच व अडीच फूट रुंद आहे. आहे. मूर्तीचे तोंड उत्तरेकडे असून ती गजमुखी आहे. सोंड उजवीकडे असल्याने सोवळे कडक आहे. त्यामुळे हा गणपती भक्तांसाठी कडक मानला जातो. गणपतीने एक मांडी घातली असून त्यावर ऋद्धि-सिद्धी बसलेल्या आहेत. प्रभावळीवर चंद्र, सूर्य,गरुड यांच्या आकृत्या असून मध्यभागी नागराज आहे. या देवळाला एक प्रदक्षिणा घालायची म्हणजे १ किलोमीटर चालावे लागते.
असा इतिहास जाणून घेऊन प्रसाद घेऊन बाहेर आलो तर पाहतो काय गावातील बरेच पोरं गियर ची सायकल व बोर्ड पाहून सायकलजवळ उत्सुकतेने जमली होती। त्यांना व उपस्थित गावकऱ्यांना मोहिमेची माहिती देत निरोप घेतला। भूक लागली होती आणि टपरीवर मस्त साबुदाणा वडे चा सुगंध दरवळत होता मग काय मस्त 3 वडे दाबून हणाले व चहाचा घोट घेत त्या काकांना रांजणगाव चा रस्ता विचारला। 3 रस्ते आहेत एक दौंड मार्गे 125 किमी, दुसरा शॉर्ट कट पण खराब रस्ता गावागावातून 110 किमी तर तिसरा श्रीगोंदा मार्गे 140 किमी।
मी देऊळगाव मार्गे निघालो। देऊळगाव ओलांडून वाटेत लोकांना वाट विचारत सायकल चालूवू लागलो। पुढे भीमा नदी ओलांडून खडखड रस्त्यावर पेडल मारत अजनुज गाव लागले। थोडा चढ चढून गावात पोहोचलो। रस्ता खराब असला तरी इकडचे गाव व शेतकरी मेहनती व सधन दिसत होते गावागावात दूध संकलन केंद्र, छान फार्म हाऊस दिसत होते। भीमा नदी काठ असल्याने शेत जमीन सुपीक दिसत होती। पुढे काष्टी गाव लागले। काष्टी येथील बाजारपेठ मोठी असल्याने बरीच वर्दळ होती। इथे मात्र अनेकांनी सायकल मोहीम विषयी प्रश्न विचारले त्यांना उत्तर देत घोड नदी ओलांडून न्हाव्वारे रोड ला लागलो। या भागात कांद्याचे भरगोस पीक घेतात। जागोजागी साठवणीघर दिसत होते। इनामगाव च्या पुढे आलो नसेल भूक लागली होती। । जवळ सिद्धटेक चा मोदक प्रसाद होता तो खाऊन पुढे निघालो पाणी संपले होते। पुढे शिरसासगव ला पाणी भरून घेऊन थोडं पुढे निघालो तर पुन्हा कॅरियर चा कट कट आवाज तसच सायकल चालवत पुढे निरवी ला एका ऑटोमोबाईल मेकॅनिक ने जुगाड करून नट बसवून दिले जे पुढे निघाले नाही। निरवी व निमोणा पर्यंतचा रस्ता खूप चढ उतार पठार असलेला शिवाय रस्ता खराब असल्याने उतारावर सांभाळून खड्डे चुकवत सायकल चालवत होतो। या रस्त्यावर अत्यंत तुरळक रहदारी होती। पुढे निरवी पोहोचलो।
इथून एक रस्ता न्हावरा तर दुसरा गुणात मार्गे निमोणे हुन रांजणगाव कडे। 2 वाजले होते पोटात कावळे ओरडत होते। गुणात ते निमोणे खराब रस्ता पार करून निमोणे पोहोचलो। 2 वाजता जिल्हा परिषद च्या शाळा सुटली होती। अनेक मुले सायकल कडे व गावकरी बोर्ड वाचून प्रश्न करत एकटेच का ? किती गणपती झाले ? पण एकाने देखील उद्धट प्रश्नकेला नाही कदाचित गावातील संस्काराचा भाग असेल की वाटसरुणा मदत करावी। मस्त राईस प्लेट आणि सोबत ताक मागवून जेवलो। भूक लागलेली असल्याने ताट चकाचक केले। उन्ह बरेच होते त्यात पाईपलाईन रस्ता पकडून करडे गावात पोहोचलो। इथून रांजणगाव औद्योगिक वसाहत सुरू होते पुढे कारेगाव हुन नगर हायवेला लागलो। 3:30 ला आरामात 115 किमी सायकलिंग करून रांजणगाव गणपती पोहोचलो।
इथे स्वागतास माझ्या आत्याच्या गावचे गावकरी व काकांचे (फुफाजी) मित्र रामा अभंग पत्नीसह उभे होते। ते मूळचे हातगाव ता शेवगाव जि अहमदनगर चे पण दुष्काळ मुळे गाव सोडून इथे रांजणगाव इथे एका कंपनीत स्थायिक झाले होते। इथे लांडे वस्ती मध्ये त्यांची एकच खोली पण त्या दाम्पत्याचे मन बंगल्याहून मोठे होते। सायकलवर प्रवास असल्याने रांजणगाव महागणपती देवस्थान समितीने लाईन मध्ये न लागता त्वरित दर्शन करू दिले।
रांजणगावच्या गणपतीचे मंदिर पूर्वाभिमुख असून, मंदिरात दिशासाधन केले आहे. उगवत्या सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतील, अशी मंदिराची रचना आहे. त्यामुळे उत्तरायणात, दक्षिणायनात व माध्यान्हकाळी गणेशाच्या मूर्तीवर सूर्यकिरणे पडतात. मंदिरातील गणपतीची मूर्ती पूर्वाभिमुख, डाव्या सोंडेची, मोठ्या कपाळाची व आसनमांडी घातलेली आहे. मूर्ती अत्यंत मोहक असून दोन्ही बाजूला ऋद्धि-सिद्धी उभ्या आहेत. दरवाजापाशी जय व विजय हे दोघे रक्षक आहेत.
दर्शन घेतल्यावर सायकलवरील बोर्ड पाहून अनेक पर्यटक भाविक कुतूहलाने विचारत होते तुमची संस्था का ? कशासाठी काम करते ? कितवा गणपती झाला ?
त्यांना उत्तरे देतांना मनात एकाच प्रश्न की सायकलचे मागील चाक आऊट झाल्याने सायकल जड जात होती। निरवी पासून रांजणगाव असा 33 किमी सपाट व उतार असून देखील अत्यंत त्रास झाला होता। गाव नुसते मोठे पण 2 तास शोधून एकही मेकॅनिक सापडला नाही। एक बोर्ड वर लिहिलं होतं की आऊट काढून मिळेल पण तो दुसऱ्या दिवशी 11 वाजता येणार होता त्यामुळे मग नाईलाजाने रामा च्या घरी मुक्कामी आलो। त्या दाम्पत्याने छान आदरातिथ्य केले। लांडे वस्ती चे मालक यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला। पुढे आश्चर्य म्हणजे फेसबुक वरील पोस्ट पाहून माझा सोमनाथ श्रमसंस्कार छावणीतील मित्र किशोर अदक भेटायला आला तेंव्हा सर्व 2012 च्या आनंदवन सोमनाथ मधील जुन्या आठवणी ताज्या झाल्या। मस्त जेऊन लवकरच 08:30 ला झोपी गेलो की उद्या पुढे नारायणगाव रस्त्यावर एक चांगला मेकॅनिक मिळेल या आशेने।










No comments:
Post a Comment