Friday, December 7, 2018

एचआयव्ही एड्स जनजागृती संवाद यात्रा: पाली खोपोली चिंचवड धायरी पुणे २०० किमी

परतीचा प्रवास: पाली पुणे २०० किमी २९ व ३० नोव्हेंबर 

दुसऱ्या दिवशी 29 नोव्हेंबर सकाळी मी आणि प्रमोदने सोबतच बल्लाळेश्वर गणपतीचे दर्शन घेऊन पालिवाला कॉलेज येथे राष्ट्रीय सेवा योजना तर्फे आयोजित एड्स जनजागृती वर संवाद साधण्यासाठी पोहोचलो। महाविद्यालयातर्फे सत्कार स्वीकारून एचआयव्ही व एड्स मधील फरक सांगत, सध्याची परिस्थिती, उपाययोजना व विविध समज गैरसमज विषयी संवाद साधला। शिवाय मागील 10 वर्षांपासून एचआयव्ही बाधित बालकांच्या शिक्षण, आरोग्य व पुनर्वसन विषयी सुरू असलेले कार्य तसेच  जीवनरेखा बालगृहात असताना व पुढे 2014 मध्ये सेवालाय प्रकल्प येथे हि मुले स्थलांतर झाल्यावर व आता ही मुले मोठी झाल्यावर रवी बापटले सरांच्या सेवालय प्रकल्प तर्फे मुलांच्या स्वयंरोजगार व प्रशिक्षण चे धडे आदी विषयी संवाद साधला। या संवाद कार्यक्रमात मुली जास्त मोकळेपणाने प्रश्न विचारताना दिसल्या तर मुले लाजळु होती असे वाटले। शेवटी राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रा बडगुजर सर, प्राचार्य व उपस्थित सर्वांचा व विशेषतः प्रमोद जाधव जो खास वेळ काढून कालपासून माझ्या सोबतच होता त्याला पुन्हा लवकर भेटण्याचे आश्वासन देऊन निरोप घेऊन परतीच्या प्रवासाकडे निघालो। 
11 वाजले होते आज कामशेत किंवा पुढे पुण्या जवळ मुक्काम करायचा होता। कालच या रस्त्यावरून आल्यामुळे खड्डे माहीत होते ते चुकवत सहज 17 किमी पार करत परळी पोहोचलो। तिथून पुढे एका हॉटेलवर चहा व चिक्की घेतली। त्यां हॉटेल चालवणाऱ्या दाम्पत्याला 4 दिवसांत अष्टविनायक पूर्ण केल्याचे नवल वाटले। पण अख्या अष्टविनायक यात्रेत रोड खराब असल्याची खंत आमच्या दोघांच्या बोलण्यात होती। या भागात रेंज नसल्याने फोन असून नसल्यागत होता पण रहदारी बरीच होती। खोपोली कडे जाताना बरेच छोटे मोठे चढ चढत 1 वाजता पाली फाटा ओलांडून थोडे पुढे आलो तर गोपाल शहा यांचा फोन की काल आपण घरी जेवण्याचे आश्वासन दिले होते त्याचे काय झाले ? मी त्यांना नम्रपणे नकार देऊन सोबत चहा घेऊ म्हणालो। पुढे हॉटेल कृष्णा येथे आम्ही सोबत इडली सांबर व शीत पेय पीत असताना थोड्या गप्पा झाल्या व त्यांना परभणी येण्याचे आमंत्रण देऊन खोपोलीकडे निघालो। वाटेत जत्रा लागली - छान रात्रपाळने, विविध खेळ, मौत का कुंवा छान जत्रा सजली होती आणि सोबत लोकांची गर्दी देखील पुष्कळ होती। गर्दीतून मार्ग काढत खोपोली गावातून NH4 ला लागलो। घोट घोट पाणी पिणे सुरूच होते एक कॉलेज गेल्यावर भोर घाटाची चढाई सुरू झाली.  मी देखील लगेच समोर 1 आणि मागे 3ऱ्या व काही वेळाने पहिल्या गियरवर चेन घेऊन घाट चढणे सुरू केले। 2 वाजल्याने उन्ह बरेच आणि शिवाय भरपूर सामान असल्याने थोडं जड जात होतं.  अखेर दीड किमी नंतर एक हायड्रेशन ब्रेक घेऊन पुन्हा चढाई सुरू मग 2 किमी नंतर शिंगोबा मंदिर पर्यंत पोहोचलो। इथे मात्र 10 मिनिट चा ब्रेक घेऊन थोडी चिक्की आणि जवळील माझा ड्रिंक पिऊन सकाळपासूनची पहिली फेसबुक पोस्ट टाकली।  शिंगोबाचे दर्शन घेऊन पुन्हा चढाई सुरू आता खंडाळा घाटाच्या दिशेने  उड्डाण पुलावरून आमची चढाई सुरू असताना वाटेत अनेक पालख्या लागल्या त्यांच्या सोबत चढतांना आणखी हुरूप येत होता। अखेर शेवटच्या टप्यात घाटांचा राजा च्या पोस्टर समोर सेल्फी घेत भोर घाट फत्ते केल्याचं मनोमय आनंद साजरा केला। मग आरामात खंडाळा टॉप वरून लोणावळा पोहोचलो। दुपारचे 03:45 वाजले होते मस्त गारेगार लस्सी पिली. पण आता वाटले की आपण कामशेत ऐवजी तळेगाव सहज सर करू.  तरी किसन टाकमोडे ला मुक्कामाची कुठे सोया होईल का ? म्हणून कॉल करून निघालो। आरामात पेंडलिंग करत कार्ला गाव क्रॉस केले। कामशेत घाट चा चढ चढून नाश्ता करण्यासाठी रेस्टॉरंटला पोहोचलो तर तितक्यात किसन टाकमोडे चे भाचे सुरेश खरसे यांचे  आग्रहाचे निमंत्रण मुक्कामी मोशीला  या म्हणून पण आता 5 वाजले होते आणि रात्री इतक्या वेळ सायकल चालवणे शक्य नसल्याने त्यांना नम्रपणे  नकार देऊन आभार मानले। तितक्यात निसर्ग सायकलमित्र चे सायकलिस्ट मारोती पवार यांचा फोन सर मी पिंपरी चिंचवड ला राहतो तुम्हाला माझ्या घरी मुक्कामी यायचंय। मी लगेच त्याना होकार दिला कारण इथून 30 किमी अंतर बाकी होते जे मी सहज दीड तासात पोहोचू शकतो। इकडे महाराष्ट्र टाइम्स चे रिपोर्टर आनंदजी कस्तुरे यांना सध्या एड्सग्रस्त व्यक्तींची विशेषतः बालके यांची आकडेवारी, त्यांच्या मूलभूत समस्या व सामाजिक सुरक्षा योजना या विषयी फोनवर माहिती देऊन नाश्ता आटोपून 05:30 ला आमची सायकलस्वारी निघाली वडगाव, तळेगाव अंतर आरामात कापले मग हेड लाईट ऑन करून सहज देहू रोड क्रॉस केले। 
इथून बरीच ट्रॅफिक होती आणी फेसबुकवर मुक्काम विषयी पोस्ट टाकल्याने फोन येत होते म्हणून थांबून लगेच मुक्कामाची सोय झाल्याची कमेंट टाकून निघालो। 7 वाजता 100 किमी सायकलिंग करून भक्ती शक्ती चौक निगडी मध्ये पोहोचलो तर पाहतो काय सायकलिस्ट मारोती पवार सर स्वागतास हजर होते। त्यांनी कृष्णनगर येथील घरी नेले अत्यंत आदरातिथ्यपूर्वक स्वागत केले। 
गरम पाण्याने अंघोळ करून आम्ही दोघं पोटभर जेवलो। मारोती पवार सर रामदेव बाबा यांचे साधक योगा, प्राणायाम पासून स्वदेशी उत्पादन, सात्विक आहार यावर त्यांचा भर स्वतःचा व्यवसाय सांभाळून पतंजली चे त्यांचे स्वतःचे स्टोअर आहे। निसर्ग सायकलमित्र ग्रुपचे अस्सल सायकलिस्ट, मनमिळाऊ स्वभावाचे त्यांच्यासोबत आजवर एचआयव्ही एड्स पासून सायकलिंग व एड्स बाधित बालकांच्या समस्यावर सुरू असलेल्या कार्यावर चर्चा केली। 
दै सकाळ पिंपरी चिंचवड आवृत्तीचे सागर शेंडे यांनी फोनवर सायकल मोहिमविषयी मुलाखत घेतली। इंडो सायकलिस्ट क्लब चे गजू दादा आणि अजित पाटील सर भेटण्यास आले त्यांनी ICC Club तर्फे स्मृतिचिन्ह व T shirt देऊन सन्मान केला व शुभेच्छा दिल्या। पुण्यात निसर्ग सायकलिंग क्लब आणि इंडो सायकलिस्ट क्लब दोघांनी सायकलिंगला प्रोत्साहन देण्यासाठी फार मोठे कार्य केले आहे। ICC क्लब सायकलिंग, रनिंग, मॅरेथॉन, Triathlon, Hiking, Swimming साठी प्रोत्साहन देते ज्याचे आज शेकडो सदस्य आहेत। निसर्ग सायकलमित्र ग्रुप ने आजवर सायकलिंग सोबत शेकडो झाडे लावून व त्यांचे संगोपन करून पर्यावरण संवर्धनाचे व्रत जोपासले आहे। माझा सोमनाथ श्रमसंस्कार छावणीतील मित्र व दै पुण्यनगरी  येथील बातमीदार अमोल काकडे भेटण्यास आला त्यांच्याशी सायकल मोहीम विषयी निवांत गप्पा मारून निरोप घेतला। 
ही संपूर्ण मोहीमच  संवाद यात्रा झाली कारण या 5 दिवसात  ओळखीचे असो व अनोळखी अनेकांशी मनमोकळेपणे बोललो, सुरू असलेल्या कामाविषयी भावना व्यक्त करता आल्या, नवीन मित्र भेटले, फेसबुकवरून अनेकांनी अस्थावाईकपणे वेळोवेळी चौकशी केली, सायकल खराब झाल्यावर असो की रात्री मुक्कामाची सोय किंवा कुठे एड्स जनजागृती कार्यक्रम असो प्रत्येकांचे शुभेच्छारुपी पाठबळ सोबत होते म्हणूनच केवळ 5 दिवसात 600 किमी अष्टविनायक सायकल प्रवास करून पिंपरी चिंचवड व्यवस्थित पोहोचलो। आता केवळ स्टेशन पोहोचून औपचारिक समारोप बाकी होता पण समाधानाची ऊर्जा घेऊ  झोपलो। 
 
आता औपचारिकता बाकी
30 नोव्हेंबर ची पहाट 5 वाजताच उजाडली साडे पाच तास झोपून देखील फ्रेश होतो। आता मी आणि मारोती पवार सरांची स्वारी निघाली आळंदीला ज्ञानेश्वर माऊलीच्या चरणी नथमस्तक व्हायला। 
मला रोड माहीत नव्हता मी केवळ मारोती पवार सरांना फॉलो करत पेंडलिंग करत होतो। आरामात 15 किमी नंतर पुणे आळंदी रोड ला लागलो। 06:30 वाजता संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर पोहोचलो तर तिथे काल ज्यांनी घरी मुक्कामी यायचे निमंत्रण दिले होते असे आदरणीय सुरेश खरसे सर आमची वाट पाहत होते। सायकली व्यवस्थित पार्क करून मुख दर्शन घेतले कारण लाईन मोठी असून हजारो भाविक भक्त दर्शनासाठी रांगेत उभे असतांना आपण केवळ सायकलवर आलोय म्हणून ट्रस्टीना दर्शनासाठी सोडा म्हणणे योग्य वाटले नाही म्हणून मुख दर्शन घेऊन प्रदक्षिणा मारून मृदंग वाजवणाऱ्या माऊलींचे आशीर्वाद घेऊन ही अष्टविनायक यात्रा पूर्ण झाल्याचे आभार मानले। आता आमची स्वारी मोशी कडे  खरसे सरांच्या घरी नाश्ता साठी निघाली। सरांच्या घरच्यांनी छान पोहे व चहा देऊन आदरातिथ्य केले। सुरेश खरसे सर मुळचे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी जवळ त्यांचे गाव अनेक वर्षापासून पुणे येथे एक कंपनीत स्थाईक झालेले अशा खरसे कुटुंबीयांचा आशीर्वाद घेऊन आम्ही पिंपरी चिंचवड पोहोचलो। 11 वाजता  महानगरपालिका शाळा धायरी येथे एड्स जनजागृतीपर संवादाचा कार्यक्रम होता म्हणून पटापट पॅकिंग करून सायकलला बांधून पवार कुटुंबियांचे आभार मानून निरोप घेतला। तरी रस्ता दाखवायला सर मुठा पुलपर्यंत आले। पुढे हायवेने आरामात पेंडलिंग करत निघालो वाटेत आरोग्यदायी नीरा आणि हायड्रेशन ब्रेक सुरू होते। पण गियर सेटिंग मध्ये प्रोब्लेम आल्याने चेन डिरेलर सोडत होती। मग वारंवार थांबून सेटिंग करत होतो। वर्किंग डे असल्याने ठिकठिकाणी ट्रॅफिक जॅम मधून मार्ग काढत  धायरी पोहोचलो। गुगल लोकेशन ने थोडा चकवले मग सरळ ऑटोवाल्याला रस्ता विचारून महानगरपालिका शाळा धायरीत पोहोचलो। मुलांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले। माझा मित्र लोकेश लाटे आणि रशीद मणियार या दोघांनी या कार्यक्रम साठी खास पुढाकार घेतला होता। लोकेश ने साने गुरुजींची प्रेरणादायी गीते मुलांकडून म्हणवून घेतली आणि तितकाच प्रतिसाद मुलांनी दिला। पुढे मी 9वि, 10वित शिकणाऱ्या मुलांशी एचआयव्ही एड्स त्याची कारणे, प्रसार, समज, गैरसमज इत्यादी विषयी माहिती देऊन आजवर या एचआयव्ही बाधित बालकांच्या हक्कासाठी सुरू असलेले कार्य व सायकल मोहिमेतून आजवर 40 हजार किमी पेक्षा अधिक सायकल प्रवास विषयी संवाद साधला। विद्यार्थ्यांत विशेषतः मुलींनी एड्स ची लक्षणे, समाजात त्याविषयी असलेले गैरसमज विषयी अत्यंत मुद्देसूद प्रश्ने विचारून शंकांचे निवारण करून घेतली। मुख्याध्यापक हिरेमठ मॅडम नि शाल श्रीफळ देऊन सत्कार केला। भविष्यात देखील पर्यावरणाचे रक्षण व प्रदूषण मुक्तीसाठी सायकल वापरण्याविषयी मुलांना आवाहन करून निरोप घेतला। इथून आमची स्वारी सम्यक फाऊंडेशन च्या कार्यालयात पोहोचली। इथे संदीप आखाडे नावाचा चळवळीतील आणि अत्यंत मेहनती कार्यकर्ता भेटला। तो  सम्यक फाऊंडेशन चे काम सोबत सध्या वृत्तपत्रविद्या विभागात पदवी घेऊन दै लोकमत मध्ये त्याची इंटर्नशिप सुरू आहे। सम्यक फाऊंडेशन चे Gender Equality वर  सखोल असे काम झाले आहे. संदीप कडून संस्थेचे काम जाणून घेतले। त्याने देखील पत्रकारितेच्या शैलीत एचएआरसी संस्थेच्या एचआयव्ही बाधितांच्या मूलभूत प्रश्नावर सुरू असलेल्या कार्याविषयी चर्चा केली।  पुढे निरोप घेऊन आम्ही साने गुरुजी स्मारक येथे पोहोचून छात्रभारती कार्यालय व राष्ट्रीय सेवा दल च्या कार्यालयास भेट देऊन तेथील कार्यकर्त्यांना सायकल मोहीम विषयी माहिती दिली। तिथे Sakal Times चा रिपोर्टर निखिल बोरकर खास मुलाखत घेण्यासाठी आला होता। 2008 पासून जीवनरेखा बालगृहातील 18 एचआयव्ही बाधित अनाथ  मुले व मग पुढे ही मुले सेवालाय प्रकल्प हसेगाव लातूर येथे स्थलांतर झाल्यावर वाढलेले व्यापक कार्य, शिक्षण आरोग्य व पुनर्वसन आदी विषयावर कार्य करतांना आलेल्या अडचणी व सायकल मोहिमेतून सुरू असलेली एड्स जनजागृती व त्यातील अनुभव अशी सविस्तर चर्चा करून निरोप घेतला। वाटेत तेजस्विनी मॅडम यांच्या बुधवार पेठेतील सहेली या संस्थेस भेट दिली। येथे  वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांच्या मुलांचे संगोपन केले जाते। त्यांचे जगावेगळे असे काम जाणून निरोप घेऊन सकाळपासून 100 किमी सायकल चालवून पुणे स्टेशन पोहोचलो। 
पार्सल ऑफिस पोहोचून सायकल बुकिंग च्या फॉर्मलिटी करून ट्रेन मध्ये चढलो असंख्य आठवणींचा खजिना व ऊर्जा घेऊन पुढील वर्षी तितक्याच जोमाने पुढील मोहिमेस सज्ज होण्यासाठी। इथे थोडा विराम घेतो.....










एचआयव्ही एड्स जनजागृती संवाद यात्रा : मंचर महड पाली

२८ नोव्हेंबर : मंचर महड पाली  १६५ किमी

रात्रीची छान झोप झाल्यामुळे सकाळी पावणे पाचला उठून आवराअवरी करून 05:36 ला सायकलवर सामान बांधून मंचर हुन निघालो। आजचा मुक्काम महड किंवा पाली त्यादृष्टीने लवकर सायकलिंग सुरवात करत 5 किमी नंतर हायवेला लागलो। थोडा चहा बिस्कीट घेतल्यावर सायकलच्या हेड लाईट च्या उजेडात सावधपणे सायकल चालवत पेठ जवळ एक थोडा चढ लागला तो चढून पुन्हा थोडा उतार मग खेडा घाट टॉप ला ज्ञानेश्वर माऊली समाधी मंदिरला जाणाऱ्या पालखीचे दर्शन घेऊन खेडा घाट उतरणे सुरू केले। दिवस उजडल्याने सभोवतालचे दृश्य नयनरम्य होते। अडीच किमी खेडा घाट उतरून राजगुरूनगर मध्ये प्रवेश केला। बस स्थानक जवळ हुतात्मा  राजगुरू स्मारक चा कुठे बोर्ड दिसतो का पाहू लागलो पण न भेटल्याने पुढे भीमा नदीवरील पूल ओलांडून पुढे आलो. तितक्यात हुतात्मा राजगुरू स्मारक चा बोर्ड दिसला मग परत त्या दिशेने विचारत गल्ली बोळ्यातून हुतात्मा राजगुरू स्मारक चे दर्शन घेण्यास पोहोचलो। भीमा नदीच्या काठावर राजगुरू वाडा आहे तिथेच हे स्मारक उभारले आहे। तिथे राजगुरूंच्या जन्मस्थळ, जन्मखोली व त्यांच्या जीवनावरील विविध पोस्टर लावले होते ते बाहेरूनच पाहून निघावे लागले। सकाळी 10 वाजता हे स्मारक उघडते तरी 07:30 ला त्यांनी बाहेरून पाहण्याची अनुमती दिल्याने या पावन भूमीचे दर्शन घेऊ शकलो। गल्लीतून फिरतांना अनेकांचे सायकल मोहिमविषयी विविध प्रश्न आणि उत्तरे असा संवाद सुरू होता। पुन्हा हायवेला लागून सहज चाकण पोहोचलो। इथून एक रोड तळेगाव कडे जातो म्हणून माहीत नसल्याने मी तसाच पुढे पुण्याकडे जात राहिलो। पुढे मोशी गाव लागल्यावर रस्ता चुकल्याची शंका आली मग लोकांना विचारत आकुर्डी मार्गे देहू पोहोचलो। मी मनात म्हटले बरे झाले रस्ता चुकलो ते निदान संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठस्थान मंदिरास माथा टेकवूया! गर्दी नव्हती आधी इंद्रायणी नदी काठी वसलेले विठ्ठल रुकमाई मुख्य मंदिर व तुकाराम महाराज जन्मस्थळ चे दर्शन घेऊन संत तुकाराम महाराज वैकुंठस्थान मंदिर येथे माथा टेकवून आशीर्वाद घेतला। आता भूक लागली होती पण विचार केला आधी हायवेला लागू म्हणून देहू रोड ऐवजी तळेगाव मार्गे लागू या उद्देशाने भंडारा हिल जवळ चाकण - तळेगाव हायवेला लागलो। तिथे हॉटेल भंडारा येथे मस्त पोटभर मिसळ पाववर ताव मारून पाणी भरून निघालो। तळेगाव पर्यंत रस्ता गजबजलेला, मध्यम वाहतूक व चढ उतार असलेले रस्ते 10 किमी नंतर पुणे मुंबई NH4 हायवेला लागलो। इथून काळजीपूर्वक चालवणे आवश्यक होते कारण प्रचंड वाहतूक, वेगाने चालणारी वाहने म्हणून बरोबर डाव्या साईड ने पेंडलिंग मध्ये एक लय ठेवत वडगाव मार्गे कामशेत पोहोचलो। पुढे थोडा 1 किमी लांब चढ लागला तो चढून लोणावळा च्या दिशेने निघालो। इथून एकीकडे डोंगर रांगा दुसरीकडे रेल्वे ट्रॅक व डावीकडे एक्सप्रेस हायवे असं छान दृश्य दिसते। पाण्याचे छोटे छोटे हायड्रेशन ब्रेक सुरू होते। वाटेत वेट n जॉय वाटरपार्क, विविध रिसॉर्ट्स, कार्ला मार्गे निसर्गरम्य ठिकाण लोणावळात प्रवेश केला। इथे मात्र विविध पर्यटक, स्थानिक, ऑटोवाले सायकलवरील बोर्ड वाचून चौकशी करत होते। येथील प्रसिद्ध लोणावळा चिक्की घेऊन पुढे छान प्रसिद्ध असा तंदुरी चहा घेऊन खंडाळा च्या दिशेने निघालो। वाटेत खंडाळा लेक पाहून थोडा चढ चढून खंडाळा घाट टॉप ला पोहोचलो। इथे विविध सनसेट पॉईंट व व्ह्यूव पॉईंट आहेत। इथून एकीकडे लांब पसरलेल्या सह्याद्रीच्या डोंगर रांगा तर दुसरीकडे एक्सप्रेस हायवे, बोगदे असे छान दृश्य दिसते। थोडा  निवांत वेळ घालवत या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत भोर घाट आरामात उतरणे सुरू केले। वाटेत बरीच मंदिर आहेत। बाहेरून एकवीरा आई मंदिराचे दर्शन घेत तीव्र उतारावर सांभाळून सायकल चालवत  भोर घाट उतरू लागलो। 8 किमी उतार नंतर खोपोली गावात प्रवेश केला। उतारावर मजा आली पण मनात विचार केला की उद्या आपल्याला याची परतफेड करायची आहे हा घाट चढून। बरोबर रस्ता विचारत खोपोली हुन महड रोड ला लागलो। 1 वाजता महड येथील अष्टविनायक पैकी एक वरद विनायक  मंदिर पोहोचलो। माझा हा 7वा अष्टविनायक गणपती त्याचे दर्शन घेण्यासाठी रांगेत लागलो। विशेष गर्दी नव्हती। छान चरण दर्शन झाले। बाजूला सुंदर कुंड आहे। 

दर्शन घेऊन नीरा पिऊन अलिबाग येथील अधिकारि श्री जयवंत गायकवाड सरांना फोन केला। त्यांनी 3 वाजता पंचायत समिती खालापूर येथे कार्यक्रम ठेवला होता। मग आरामात खालापूर येथील विश्रामगृह येथे पोहोचून जेवण वगैरे आटोपून 3 वाजल्याची वाट पहात असतांना फेसबुकवरील पोस्ट पाहून परभणी येथील आमच्या वाहिनी सौ रिपल मितेश शहा यांचा फोन की खालापूर त्यांचे माहेर आहे प्लिज घरी जा। पण वेळेची मर्यादा असल्याने त्यांना नकार दिल्याने त्यांचे भाऊ गोपाल शहा भेटण्यास आले त्यांना भेटून खूप आनंद झाला। गोपाल शहा हे मूळचे खालापूर निवासी त्यांचे येथे किराणा दुकान व कोका कोला ची एजन्सी असे नामवंत व्यवसायिक पण त्यांच्या बोलन्यात अत्यंत साधेपणा व मनमिळाऊ स्वभावाचे  असे.  त्यांना  उद्या जेवायला येण्याचे आश्वासन देऊन निरोप घेऊन पंचायत समिती खालापूर येथे पोहोचलो। तिथे बीडीओ साहेबांच्या  हस्ते माझा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी गटविकास अधिकारी श्री संजय भोये, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक श्री जयवंत गायकवाड, विस्तार अधिकारी श्री भालेराव मॅडम, दत्तात्रय नाईक व महिला बचत गट च्या सदस्य उपस्थित होत्या। या प्रसंगी मी एचआयव्ही एड्स विषयी माहिती देतांना त्याविषयी आलेल्या विविध गैरसमज मुळे एचआयव्ही बाधित बालके त्यांच्या मुलभुत हक्कांपासून वंचित राहतात। म्हणून त्यांचे मूलभूत हक्क शिक्षण आरोग्य व पुनर्वसन  या प्रश्नावर परिपूर्ण आशा उपाययोजनेची गरज आहे म्हणून या प्रश्नांवर  संवादातून जनजागृती व्हावी म्हणून मी विविध सायकल मोहिमेतून जनजागृती करत असल्याचे म्हणालो। उपस्थितांच्या शुभेच्छा घेऊन निरोप घेतला। 
पावणे चार वाजले होते। पुढे एक चढ चढून पाली फाट्याला लागलो। इथून खरी परीक्षा होती। कारण पाली ते दिघी जेट्टी हा रहदारीचा रस्तावर सिमेंट रोडच्या कामामुळे ठिकठिकाणी खोद काम केलेले होते। सावकाश खड्डे चुकवत सायकल चालविल्यामुळे वेग मंदावला होता। ऍडलॅब इमॅजिका चौकात ताक पिऊन निघालो। पुढे रस्ता चढ उतार व रस्ता खराब असल्याने उताराचा फायदा होत नव्हता पण दोन्ही बाजूला जंगल त्यामुळे सायकल चालवताना उत्साह होता। सकाळ पासून 130 किमी होऊन देखील थकवा नव्हता। उंबरे, दुरशेत नानोसे गाव गेले परळी ला पोहोचलो। उंबरे इथून उबरखिंड छावणीकडे साठी रस्ता फुटतो । उंबरखेड छावणीत निवडक मावळ्यांनी गनिमी कावा पद्धतीने लढा देत ही खिंड लढवून मुघल फौजांना नाकी नऊ आणले होते असा इतिहास आहे।  तर दुरशेत चे नाव मी ड्युइथलॉन साठी ऐकले आहे। इथून केवळ 17 किमी बाकी पण सायंकाळचे 05:45 झाले होते। इथे थोडे पायात गोळे आल्यासारखे वाटू लागले म्हणून चहा व मोनाको बिस्किट घेतले। इथे अनेक जणांनी अष्टविनायक मोहीम विषयी चौकशी केली। चहा मुळे मला देखील थोडा उत्साह व 4 थ्या दिवशीच अष्टविनायक यात्रा पूर्ण होणार म्हणून आनंद असल्याने तितक्याच उत्साहाने उत्तरे देत होतो। मला वाटले आता खराब रस्ता संपला आणि पाली 8 किमी बाकी असताना  अंदाज चुकला. एक साईडने रोड खोदून ठेवल्याने संपूर्ण धुरळामुळे  आणि येणारे वाहने कर्णकर्कश हॉर्न वाजवून खाली उतरण्यास मजबूर करत होते अखेर आता माझी सटकली होती....
सायकल साईड ला घेऊन तोंडावर मास्क आणि डोळ्यावर गॉगल चढवून धुळीच्या साम्राज्यात लढत धुरळा उडवणार्या वाहनातून सावध मार्ग काढण्यास तयार होऊन निघालो। ७ किमी च्या या धुळीच्या ऑफ रोडवर सायकल चालवताना मला युद्धभूमीवर घोडा चालवल्यासारखे वाटले अखेर आमच्या लढाऊ बाण्यापुढे रस्त्याने शरणागती पत्करली आणि 7 किमी नंतर आमची स्वारी अष्टविनायक पाली गावात दाखल झाली। 
पाली येथे माझे तरुणाईच्या वेगळ्या वाटा (गेवराई 2014) मध्ये भेट झालेले फेसबुक मित्र व शिवम प्रतिष्ठान व सृजन यात्रेनिमित्त महाराष्ट्रातील सामाजिक संस्थांना जोडणारे प्रमोद जाधव व दापोली येथे बीडीओ म्हणून कार्यरत असलेली त्यांची पत्नी सुवर्णा बागल यांनी शासकीय विश्रामगृह येथे व्यवस्था केली होती। मी फ्रेश होऊन बल्लाळेश्वर अष्टविनायक गणपती मंदिर पाली येथे दर्शनास पोहोचलो। बल्लाळेश्वर गणपतीचे दर्शन घेऊन प्रसाद घेतांना तेथील देवस्थान समितीने माझे अष्टविनायक पूर्ण झाल्याबद्दल स्वागत करून परतीच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या। दर्शन घेऊन कुंड येथील विविध रंगांची उधळण करणाऱ्या तुषारांचा आनंद घेत मागील 4 दिवसांचा मागोवा घेत बसलो होतो। थोड्या वेळाने थोडं कोकम शरबत घेऊन घरी 8वे अष्टविनायक  पूर्ण केल्याचा निरोप देऊन शासकीय विश्रामगृह येथे पोहोचलो तर पाहतो काय माझे मित्र प्रमोद जाधव खास माणगाव हुन मला भेटण्यासाठी आले होते। त्यांच्याशी त्यांच्या लग्नात त्यांनी केलेल्या पुस्तकरूपी आहेर पासून सृजन यात्रेतून सामाजिक संस्थांच्या भेटी ते शिवम प्रतिष्ठान कराड आशा विविध मुद्यांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या। रात्रीचे जेवण करून मग केंव्हा झोप लागली ते कळाले नाही। 


















Wednesday, December 5, 2018

पुणे अष्टविनायक सायकलवर संवाद यात्रा : रांजणगाव ओझर लेण्याद्री मंचर 115 किमी


27 November 2018: रांजणगाव ओझर लेण्याद्री मंचर 115 किमी 

पहाटे 04:30 वाजताच जाग आली। फ्रेश होऊन सायकलच्या स्पोक्स ला काही करता येईल का म्हणून पाहू लागलो तर लक्षात आले की 2 स्पोक्स तुटलेत 4 लूज झालेत। त्याला तसेच टाईट करून निघण्याची तयारी सुरू केली। मनात द्विधा मनःस्थिती होती की 11 वाजे पर्यंत इथेच वाट पाहून मेकॅनिक शोधावा किंवा तसेच नारायणगाव च्या दिशेने चालवत न्यावे। गणपती बाप्पांचा आशीर्वाद सोबत आहेच ना काही होणार नाही।  रामा अभंग दाम्पत्याचा निरोप घेऊन सकाळी 6 वाजता लाईट लावून रांजणगाव मंदिर पासून उजवीकडे वळलो। इथून रोड थोडा चढ उताराचा पण ऑफ रोड सोबत वारंवार स्पीड ब्रेकर असल्याने सावकाश चालवत मलठण रोड ला लागलो। वाटेत मॉर्निंग वॉक करणारे अनेक लोक भेटत होते। सायकलचे मागचे चाक पूर्ण आऊट असल्याने आवाज करत होते जड देखील जात होते. शिवाय उतारावर वेग देखील येत नव्हता। वाटेत एकाने मलठण ला सायकल दुरुस्तीचे दुकान असल्याचे सांगितले आणि जिवात जीव आला। 7 वाजले होते दुकान बंद होते पण त्याच्या घरी विचारले असता 30 मिनिटाने तो आला। त्याने पाहिले असता आणखी 2 असे ऐकून 4 काड्या तुटल्या होत्या। त्याने चाक उघडला, छरे काढले पण फ्री व्हील चा पाना नसल्याने ते निघेना। शेवटी त्याला आहे तो स्पोक्स टाईट करून तुटलेले स्पोक्स काढून टाकण्याची विनंती केली। किमान नारायणगाव पर्यंत जाईन या आशेने निघालो। त्याने केवळ 10 रुपये भवणी म्हणून घेतले। चौकात आलो नसेल सायकल जड जाऊ लागली। तितक्यात शिक्रापूर येथील 4 सायकलिस्ट भेटले त्यांनी नारायणगाव किंवा मंचर शिवाय सायकल दुरुस्ती होणार नसल्याचे सांगितले। मग त्यांचा निरोप घेतला मागील ब्रेक काढून आमची स्वारी निघालो ब्रेकलेस सायकलिंग टू नारायणगाव 45 किमी बाकी। 

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्यावरून पेडल मारत निघालो वाटेत कवठे गाव ओलांडून काळू बाई मंदिराचे बाहेरूनच दर्शन घेऊन पारगाव शिंगवे पोहोचलो। इथे साखर कारखाना असल्याने बरीच वर्दळ आहे। येथील ओली भेळ प्रसिद्ध आहे। भूक लागली कारण सकाळपासून केवळ चहा बिस्किटवर होतो। ओली भेळ खात असतांना सायकलवरील बोर्ड वाचून अनेक तेथील गिऱ्हाईक सायकल मोहिमविषयी प्रश्नांची सरबत्ती सुरू होती। शेवटी चहा पिऊन बॉटल भरून नारायणगाव कडे निघालो। वाटेत कालचीच काष्टी ला लागलेली घोड नदी ओलांडून रोड ला लागलो। येथे मीना नदी घोड नदीच्या संगमावर छान संगमेश्वर मंदिर आहे। थोडे फोटोसेशन करून निघालो। रांजनी, मांजरवाडी मार्गे 11 वाजता नारायणगाव पोहोचलो। आधी तेथील हायवे पोलिसांना विचारून सायकल शॉप शोधले। नाशिक हायवेवर अजंठा सायकल मार्ट मोठे दुकान होते। त्याच्या कडे पोहोचून मालकाला सर्व अडचण सांगितली। त्याच्या कडे बरीच गर्दी होती। अखेर 45 मिनिटाने नंबर लागला। त्यांन व्यवस्थित चाक उघडून, ट्यूब टायर बाजूला करून रिंग बाहेर काढले पण फ्री व्हील उघडण्यासाठी त्याच्या कडे देखील पाना नाही। पूर्ण शोधाशोध केल्यावर मालक मला पुण्याला घेऊन जा म्हणाला तेंव्हा क्षणभर मी घाबरलो की आपली यात्रा खंडित होते का ........

शेवटी त्या मालक मेकॅनिक दोघांना विनंती केली की काहीही करा पण हे दुरुस्त करून द्या। मग काय झाले की त्या मेकॅनिक ला अचानक हुरूप आला फ्रीव्हील चा पाना नसतांना देखील त्याने छानपैकी 5 नवीन  स्पोक्स जोडुन होईल तितका आऊट काढण्याचा प्रयत्न केला। थोडं ब्रेक ला घासत होते तिथे देखील हात फिरवून 1 तासात सायकल रेडी करून दिली। त्याला बिल विचारले असता फक्त 50 रुपये घेतले। गणपती बाप्पा मोरया नाव घेऊन त्याचे आभार मानुन निरोप घेऊन ओझर कडे निघालो।  

ओझर 10 किमी मला वाटले अर्धा तासात सहज पोहोचू पण इथे रस्ताच  नाही प्रचंड  ऊस वाहतूक मुळे पूर्ण उखडला गेलाय त्यामुळे 2 वाजता ओझर पोहोचलो तर स्वागतास माझा सोमनाथ छावणीतील शिबिरार्थी सुदर्शन कांबळे सर्व मित्र परिवार स्वागतास हजर। ओझर विघ्नहर गणपतीचे दर्शन गर्दी नसल्याने शिवाय दागडुजीचे काम चालू  असल्याने लगेच झाले। 

विघ्नहराच्या मंदिराच्या पुढे २० फुट लांब सभागृह असून आतील गाभारा १० बाय १० फुटाचा आहे. मंदिराच्या कडेने मजबूत संरक्षक भिंत आहे. येथील पूर्वाभिमुख मूर्तीच्या कपाळावर नाभीवर हिरे आहेत.

विघ्नहर देवस्थान समितीने शाल श्रीफळ देऊन सत्कार केला। तेंव्हा मी एचआयव्ही बाधित बालकाच्या मूलभूत प्रश्नांवर सायकल मोहिमेतुन सुरू असलेल्या यात्रे विषयी जनजागृतीपर संवाद साधला। शेवटी सर्वांचा निरोप घेत तलाव जवळ फोटो काढून लेण्याद्री रोड ला लागलो। इथून केवळ 15 किमी पण अत्यंत खराब रस्ता म्हणून कॅनॉल रोड ने निघालो। पुढे एका निसर्ग ग्रामीण पर्यटन केंद्र येथील प्रसिद्ध मासवडी जेवण जेवलो। या भागात बेसनाच्या वड्या त्यात मसाला भरून मासवाडी तयार करतात जी या भागात  प्रसिद्ध आहे। जेऊन लेण्याद्री रोड ला लागलो पुढे एक रस्ता शिवनेरी किल्ला तर दुसरा लेण्याद्री कडे जातो। पुढे अत्यंत कठीण भर उन्हात घाम काढणारा असा दीड किमीचा चढ चढून लेण्याद्री पोहोचलो। पार्किंग ला सायकल लावून अवघ्या 10 मिनिट मध्ये 350 पायरी चढून लेण्याद्री गणपती मंदिर पोहोचलो।


लेण्याद्री (गिरिजात्मज) हे देवस्थान सात क्रमांकाच्या गुहेत असून देवस्थानासमोरील सभामंडप ५१ फूट रुंद ५७ फूट लांब आहे. त्याला कोठेही खांबाचा आधार नाही. देवस्थानाजवळ पाण्याच्या चार टाक्या असून त्यांना वर्षभर पाणी असते.  मंदिर या वास्तुसंकल्पनेतील खांब, कमानी, मंडप, शिखर या कुठल्याच गोष्टी नाहीत. खांबविरहित ५७ फूट लांब ५२ फूट रुंद गुहा हेच मंदिर आहे. या मूर्ती इतर अष्टविनायकांप्रमाणे आखीव रेखीव नाहीत. ही गुहा अशा प्रकारे बनवली आहे की जोपर्यंत आकाशात सूर्य आहे तोपर्यंत प्रकाश आत येत राहणार. गुहेत विजेचा एकही बल्ब नाही. ही गुहा कोणी बनवली, कधी बनवली याची कोणतीच नोंद नाही.
या देवस्थानाच्या पूर्व पश्चिम बाजूंस २८ लेणी आहेत. एकाच मोठया आकाराच्या शिळेत ही लेणी कोरली आहेत

इथून खूप विहंगम दृश्य दिसते समोर शिवनेरी किल्ला आणि दुसरीकडे भिमाशंकर कडे जाणाऱ्या डोगररांगा। लेण्याद्री गिरिजात्मक अष्टविनायक गणपतीचे दर्शन घेऊन खाली सहज उतरलो। लिंबू पाणी घेऊन सुदर्शन चा निरोप घेतला पुन्हा भेटण्याच्या अटीवर। आता राजगुरूनगर मुक्काम शक्य नव्हते कारण पावणे पाच वाजले होते म्हणून मंचर मुक्काम करायची इच्छा असलेली फेसबुकवर पोस्ट टाकून निघालो। थोडं जुन्नर जवळ आलो असेल तितक्यात धुळे चे सायकलिस्ट सायकलवर नर्मदापरिक्रमा केलेले डॉ प्रशांतचंद्र पाटील सरांचा कॉल की त्यांचा मित्र डॉ ओंकार काजळे कडे मंचर येथे सोय केलीय म्हणून। लगेच आनंदाने खड्डे चुकवत एक नदी ओलांडून जुन्नर गावातून रस्ता विचारात नारायणगाव रोड च्या दिशेने निघालो। वाटेत शेतकरी हॉटेल वर चहा बिस्किटंचा ब्रेक घेतला। त्या हॉटेलचे मालक कबड्डीपटू होते जे अनेकवेळा परभणीत स्पर्धे निमित्त आले होते। चहा बिस्कीट घेतल्यावर पैसे देऊ केले तर त्यांनी नम्रपणे नकार देत पुन्हा येण्याचे आश्वासन दिले। 6 वाजता नारायणगाव गावातून ट्रॅफिक मधून मार्ग काढत असतांना अनेकांचे लक्ष माझ्या जनजागृती बोर्ड कडे वेधले जात होते। सायंकाळ झाल्याने  सायकलचा लाईट ऑन करून सहजपणे मंचर गाठले। इथे पाहिले तर मर्सिडीज प्रमाणे Montra & Track n Trail Bicycle चे शोरूम पाहून हपकलो।  डॉ ओंकार काजळे सर स्वतः घ्यायला आले होते। त्यांनी सहकुटुंब स्वागत केले। डॉ ओंकार डॉ सौ काजळे दोघेही BAMS डॉक्टर असून जनरल प्रॅक्टिश करतात तर त्यांचे भाऊ वडील वकील असून त्यांचे गारमेंटचे मोठे दुकान आणि संपूर्ण कुटुंब साई भक्त आहेत। फ्रेश होऊन त्यांच्या कुटुंबासह छान जेवण घेत निवांत आरोग्यपासून ते सायकलिंग एड्स जनजागृती पुनर्वसन विषयी सुरू असलेल्या कार्याविषयी संवाद साधला। 9 वाजता निरोप घेऊन झोपी गेलो कारण उद्याचे अंतर बरेच होते।