Tuesday, July 17, 2018

दिवस तिसरा: पंढरपूर कुर्डुवाडी ६० किमी

दिवस तिसरा: पंढरपूर कुर्डुवाडी  ६० किमी

१५ जुलै ला सकाळी आरामात उठून सर्व मुलांशी मस्त गप्पा मारल्या. फ्रेश होऊन चहा घेऊन त्यांचा सर्वांचानिरोप घेतला पुढच्या वारीत लवकरच भेटण्याचा शब्द देऊन निघालो.विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात आमचा सायकलवारीला बोर्ड पाहून अनेक लोकांच्या प्रश्नाचे उत्तरे देत छान जनजागृती झाली। तिथे नाशिक, मंगळवेढा हुन आलेले अनेक सायकल वारकरी भेटले. सायकल वारकरी म्हणजे आमचं खास म्हणायचं त्यांच्याशी प्रवासा विषयी बोलत मुख दर्शनाच्या लाईन ला लागलो. तेथे परभणीतील अनेक वारकरी मित्र भेटले. पुढे भक्त पुंडलिकाच्या मंदिराचे दर्शन घेऊन निघावे म्हणतो तर तितक्यात डिंपल ताईंचा फोन मग नाश्ता ला जावे लागले.

पुढे भक्त पुंडलिकाच्या मंदिराचे दर्शन घेऊन निघावे म्हणतो तर तितक्यात डिंपल ताईंचा फोन मग नाश्ता ला जावे लागले.  डिंपल ताई आणि तिची वाहिनी दोघाणे प्रेमाने आदरातिथ्य केले. पालवीतील मुलांनी तयार केलेल्या रुमाल विकत घेऊन पुढच्या वर्षी निवांत येण्याचे आश्वासन देऊन निरोप घेतला. आता पंढरपूर कुर्डुवाडी 60 किमी अंतर बाकी होते. चांद्रभागेवरील पूल ओलांडून शेतफळ च्या दिशेने पेडलिंग करत निघालो.  रस्ता खाली वर होता सोबत उन्हाचा त्रास आणि खूप खराब शिवाय ठिकठिकाणी सिमेंट रोड चे काम चालू असल्याने सायकल चालवताना मनगटाला मुंग्या येत होत्या. थोडी स्ट्रेचिंग करून पाणी पिऊन ग्लोव्हज घातले. आरामात पेडलिंग करत 32 किमी नंतर शेतफळ पोहोचलो. आता केवळ 22 किमी बाकी बॉटल मध्ये ओआरएस भरून घेतले. वाटेत काही पालखी आणि वारकरी भेटत होते.आमच्या सायकल वारी बद्दल विचारत होते. पुढील रस्ता खडबड व माळरान चा असल्याने चढ उतार होता. वाटेत पावसाने गाठले आम्ही देखील मस्त भिजत आरामत कुर्डुवाडी स्टेशन पोहोचलो. आम्ही अत्यंत आनंदी होती की केवळ 2 दिवस साडे तीन तासात ही 345 किमी सायकलवारी पूर्ण केली. पार्सल ऑफिस मध्ये सायकल बुक करायला गेलो तर रविवार सांगून नकार मग एलटीटी अर्थात लगेज ट्रॅव्हल तिकीट म्हणून घ्या विनंती केली तर हॉलिडे ट्रेन आहे म्हणून पुन्हा नकार. शेवटी विनवणी केल्यावर 5 वाजता या म्हणून हाकलून लावले. आम्ही कंटाळून जेवायला गेलो तर सहज इंदापूर चे कैलास कदम सरांना फोन लावला काही मदत मिळतील का ? म्हणून त्यांनी लगेच प्रतिसाद देत कुर्डुवाडी पोलीस स्टेशनच्या आरिफ सरांनी संबंधित पार्सल ऑफिसर ला कळवले आणि लगेच आम्हाला सायकल बुकिंग च्या फॉर्मलिटी चा निरोप मिळाला. अखेर 5 वाजता सायकल बुक करून ट्रेन मध्ये चढलो. शेवट पांडुरंगाच्या आशीर्वादाने गोड झाला कोणत्याही कटू आठवणी किंवा अनुभव मनात न येता.  विशेषतः आकाश गीते ची मोलाची लागलेली साथ.

दिवस दुसरा: चौफुला भिगवण इंदापूर पंढरपूर १६५ किमी

दिवस दुसरा: चौफुला भिगवण इंदापूर पंढरपूर १६५ किमी

१४ जुलै ला सकाळी 5 वाजता उठून 05:50 ला निघालो. भिगवण येथील ग्रुप आम्हाला न्यायला खडकी येथे येणार होता. रस्ता चढ उतार रोलिंग होता. त्यामुळे वारंवार गियर बदलत सायकल चालवत होतो. पाटस नंतर मळद पासून रस्त्याच्या उजव्या बाजूच्या सर्व्हिस रोड ने 2 किमी आलो असेल तेथे भिगवण सायकलिंग क्लब आमच्या स्वागतास सज्ज होता. त्या सर्वांनी आमचे स्वागत केले. मागच्या वर्षीच्या पंढरपूर सायकल वारी दरम्यान सायकलिंग साठी मी केलेले आवाहन त्यांनी इतके मनावर घेतले की आज भिगवण येथे सायकलींग ग्रुप तयार होऊन ते रोज 25-30 किमी सायकलिंग करतात. त्यांच्या सोबत भिगवण येथे पोहोचून आम्ही 10 झाडे लावली. भिगवण सायकलिंग क्लब व नेचर क्लब भिगवण व रोटरी क्लब भिगवण च्या सदस्तासोबत मस्त मिसळ पाव चा आस्वाद घेत सर्वांशी सध्या एचआयव्ही बाधित बालकांच्या प्रश्नावर सुरू असलेल्या कार्याबद्दल संवाद साधला. लगेच आम्हास इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ च्या कला महाविद्यालय येथे कार्यक्रम असल्याचे कळाले. प्रा प्रशांत चवरे जे तेथील प्राध्यापक व दै सकाळ चे बातमीदार त्यांनी या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला होता. या प्रसंगी डॉ. जयप्रकाश खरड, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष रियाज शेख, प्राचार्य भास्कर गटकुळ, प्रा. पद्ममाकर गाडेकर उपस्थित होते. मी विद्यार्थांना म्हणालो "आषाढी वारीच्या माध्यमातून संतानी समाजातील अनिष्ठ प्रथा, अंधश्रध्दाविषयी प्रबोधन केले. सध्या एचआयव्ही एडस् रोगामुळे व एचआयव्ही एड्स बाधितांना समाजाकडुन मिळणाऱ्या दुय्यम अथवा हीनदर्जाच्या वागणुक यामुळे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होत आहेत. या अत्यंत ज्वलंत विषयावर वारीच्या माध्यमातून प्रबोधन व्हावे यासाठी आळंदी ते पंढरपुर सायकलवारीच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन करण्याचे काम करत आहे. समाजाने एडसग्रस्तांना मानवतेची वागणुक द्यावी असे आवाहन करतो".  पुढे डॉ जयप्रकाश खरड यांच्या गच्चीवरील बागेला भेट दिली.  त्यांनी या बागेत सेंद्रीय भाजीपाला, विविध फुले, कमळ फुलवले आहेत. वेळेची मर्यादा असल्याने सर्वांचा निरोप घेऊन निघालो. भिगवण पळसदेव इंदापूर रस्ता चढ उताराचा होता आणि सोबत ऊन तापल्याने घामाच्या धारा वाहत होत्या. पळसदेव ला ओआरएस तयार करून घोट घोट घेत एक एक चढ व्यवस्थित गियर बदलत पार केले. इंदापूर च्या वेशी जवळ कैलास कदम सरांचा फोन आला. ते सर्व वाट पाहत होते. कैलास कदम हे इंदापूर नगरपरिषद येथे नगरसेवक व काँग्रेस चे गटनेते शिवाय डॉ जयप्रकाश खरड यांना गुरुस्थानी मानतात. काँग्रेस भवन इंदापूर येथे त्यांनी  आम्हा  दोघांना खास फेटे बांधून स्वागत केले. या कार्यक्रमास इंदापूर अर्बन बॅंकेचे अध्यक्ष भरत शहा इंदापूर चे नगरसेवक, काँग्रेस चे पदाधिकारी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. माझ्या मनोगतात मी सेवालय प्रकल्प येथे संस्थापक रवी बापटले सर यांचे सुरू असलेले कार्य व त्यां मुलांना एचएआरसी संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेले कार्य, जनसामन्यांत एड्स विषयी जनजागृती साठी सायकल प्रवास, 18 वर्षा वरील विद्यार्थ्यांचा रोजगार चा प्रश्न व चांगले आरोग्य तंदुरुस्ती व प्रदूषण मुक्त पर्यावरण साठी कोणतीही बॅक अप व्हेहिकल न ठेवता सुरू असलेला सायकल प्रवास विषयी संवाद साधला. कार्यक्रम नंतर दै सकाळ चे पत्रकार सागर शिंदे यांनी माझी मुलाखत घेतली. पुढे फळांचा अल्पोपहार घेऊन अकलूज कडे निघालो. आता खरी परीक्षा होती अकलूज 30 किमी आणि वेळापूर 41 किमी। मुक्काम वेळापूर ला करू असे ठरवले होते. इंदापूर अकलूज वेळापूर दरम्यान  उलट्या वाऱ्याचा अर्थात हेड विंड चा त्रास सोबत उन्हाचा त्रास होत होता. आम्ही पहिला ब्रेक 12 किमीवर सुरवड येथे घेऊन थोडी केळी, ओआरएस पिऊन स्ट्रेचिंग करून निघालो. या रोडवर ठिकठिकानी वारी संदर्भात छान सुविचार लिहिले होते शिवाय दुतर्फा झाडे असल्याने हायवे पेक्षा बरे वाटत होते. वाटेत 1 मोठी पालखी लागली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम चा जयघोष करत वारकर्यांना नमस्कार करत निघालो. पुढे बावडा गाव लागले तेथील काही लोकांनी बोर्ड पाहून विचारपूस केली आणि आम्ही देखील आवडीने उत्तरे दिली. उन्हामुळे त्रास होत होता परंतु जनजागृती कार्य महत्वाचे असल्याने चिडचिड न होता लोकांशी संवाद साधण्यात आनंद मिळत होता. पुढे नीरा नदीच्या पुलावर आलो तर पाहतोय काय मागील वर्षी पेक्षा पाणी कमी दिसत होते.  पुण्यात पाऊस भरपूर होता पण सोलापूर त्या मानाने कोरडा वाटला. पेडलिंग करत अकलूज पोहोचलो मस्त एक गुजराती गाड्यावर बदाम शेक पिले. बदाम शेक माझे आवडते पेय शिवाय हाय कॅलरी व एनर्जी देणारे ड्रिंक हवे होते सोबत तितकाच अर्धा तास आराम मिळाला. पुढे 11 किमी नंतर वेळापूर सहज गाठले. माझा श्रमसंस्कार छावणीतील मित्र ह.भ.प. स्वामीराज भिसे याच्या कुटुंबीयांनी आमचे स्वागत केले. त्याच्या संपूर्ण कुटुंब वारकरी संप्रदायाशी निगडित, ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीत अनेक वर्षांपासून सेवा करणारे कुटुंब व त्याचे वडील पत्रकार सूर्यकांत भिसे यांचा पालखीत विशेष मान असतो.  दोन्ही भाऊ मराठी चित्रपट व नाट्यक्षेत्रात प्रसिद्ध कलावंत तर स्वामीराज हा पत्रकार असून दिंडीत स्वच्छता व प्रबोधनाचे कार्य शिवाय कीर्तन व आध्यत्मिक विषयावर व्याख्यान देखील देतो. त्याच्या घरी फ्रेश होऊन मस्त पोहे, चहा घेतला. सायंकाळचे 5 वाजले होते व  पंढरपूर पर्यंतचे केवळ 33 किमी अंतर बाकी असल्याने वेळापुर येथील मुक्काम टाळून सर्वांचा निरोप घेऊन आमची चाके चालली पंढरपूर च्या दिशेने. वाटेत एक पोरगा "ओ मामा गियर टाका ना" म्हणत वेगाने सायकल आमच्या पुढे नेऊन म्हणाला "बघा मी गियर च्या सायकलला मागे टाकले". आम्ही देखील त्या निरागस चिमुकल्याच्या यशास दाद देत त्यास शाबासकी दिली.  थोडा उतार चढ असल्याने आम्ही अत्यंत उत्साहाने पेडलिंग करत तोंडाळे मार्गे भांडीशेगाव येथे पोहोचलो. भंडीशेगाव येथील बाजार प्रसिद्ध आहे. थोडी स्ट्रेचिंग करून पाणी  पिऊन निघालो. आता केवळ 15 -20 किमी अंतर बाकी होते. आता आम्हाला 'भेटी लागी जीवा लागलीशी आस' प्रमाणे केंव्हा पंढरपूर पोहोचतो याची ओढ लागली होती. सायंकाळी 7 वाजता दिवसभरातील 162 किमी आणि मागील 2 दिवसातील 275 किमी सायकलिंग करून पंढरपूर च्या चौकात पोहोचलो. पुढे एक रस्ता मंदिर कडे तर दुसरा रस्ता 5 किमीवर आमचया विठ्ठलाकडे अर्थात पालवी एड्स मुलांचे पुनर्वसन केंद्र येथे जातो. जवळील सुपर शॉपिवरून मुलांसाठी 7 किलो पेंड खजूर घेतले तर तितक्यात जोरात पाऊस सुरू झाला. बाजुच्या हॉटेल वरून पिशवी मागून आम्ही पालवी कडे निघालो तर 5 किमी मध्ये पाऊस आणि उलटा वारा आम्हाला रोखू पाहत होता. पण आमचा दृढ निश्चय असल्याने आम्ही सायंकाळी 07:40 ला पालवी प्रकल्पला पोहोचलो.  तेथील विद्यार्थांनी आम्हाला ओवाळून औक्षण केले। त्यांचे स्वागत पाहून आमचा थकवाच लगेच निघून गेला. मंगल ताई शहा या पालवी प्रकल्प च्या संस्थापक व 115 एचआयव्ही बाधित अनाथ बालकांचा सांभाळ करतात. आता त्यांची मुलगी डिंपल गाडगे आणि राजकुमार गाडगे हे हा प्रकल्प तितक्याच समर्थपणे चालवत आहेत. आम्ही फ्रेश होऊन जेवायला बसलो तितक्यात मंगल ताई खास आमच्यासाठी दाल बाटी आणि चुरमा घेऊन आल्या.  मस्त दाल बाटी चुरमा आणि सोबत मेतकूट चा आस्वाद घेत पोटभर जेवलो. जेवणानंतर ताई सोबत या मुलांचे विविध प्रश्न विशेषतः 18 वर्ष पूर्ण झाल्यावर रोजगाराचा प्रश्न यावर चर्चा तसेच या मुलांना चांगले संस्कार व्हावेत म्हणून मंगल ताईंनी विविध पुस्तक, लेख त्याची कात्रणे, भित्तीपत्रके, विविध क्षेत्रातील मान्यवरांची व्याख्याने, पालकत्व आदी विषयावरील कार्याबद्दल सांगितले. खरच मंगल ताईंचे या मुलांसाठी नवनविन उपक्रम स्तुत्य आहेत. आम्ही मुलांसाठी आणलेला खाऊ अर्थात पेंड खजूर व काही आर्थिक मदत ताई कडे सुपूर्द करून खऱ्या अर्थाने वारीचा समारोप केला.  थकल्याने लगेच झोप लागली.

दिवस पहिला: पुणे आळंदी चौफुला ११४ किमी

दिवस पहिला: पुणे आळंदी चौफुला ११४ किमी 

13 जुलै ला सकाळी 06:15 वाजता पुणे स्टेशन पोहोचून पार्सल ऑफिस मधून सायकलची डिलिव्हरी घेऊन 06:45 ला पेडल मारत आळंदी च्या दिशेने निघालो। वाटेत रुबी हॉल क्लीनिक ला मस्त गरम चहा आणि क्रीम रोल खाऊन निघालो तर येरवडा पर्यंत आलो नसेल तितक्यात जोरदार पावसाने आम्हाला गाठले. लगेच आम्ही देखील रेनकोट घालून त्याचा सामना करायला सज्ज होतो. मग विश्रांतवाडी, दिघी गावा पर्यंत पोहोचलो तर आमचा  सायकलिस्ट दोस्त निरंजन वेलणकर सायकलवर आमचे स्वागत करायला आला. नमस्कार माऊली म्हणत त्याचे स्वागत स्वीकारत आणि सोबत रिपरिप पावसामुळे उडणारे चिखल आणि बाजूने जाणारे वाहनधारक यांचे फुकटचे सल्ले ऐकत आम्ही आळंदी कडे मार्गक्रमण करत होतो.  मग इंद्रायणी नदीवरील पूल ओलांडून ज्ञानेश्वर माऊलीच्या मंदिराच्या महाद्वारापाशी पोहोचलो. आमच्या सायकलवरील 'एचआयव्ही बाधित अनाथ बालकांच्या हक्कासाठी जनजागृती' हा बोर्ड सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होता. सिग्नल वर थांबल्यावर असो की चौका चौकातून जाणारे लोक आम्हाला विचारत होते कुठून आले ? कुठे आणि कशासाठी चालले ? आणि सायकल वरच का ? मग त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आणि पुढे मार्गक्रमण करायचे.
सायकलला लॉक न लावता आम्ही तिघे अर्थात मी, आकाश आणि निरंजन ने दर्शन घेतले आणि माउलीला साकडे घातले की आमच्या या अनाथ, एचआयव्ही बाधित बालकांचे प्रश्न सोडविण्यासाठी बळ दे.
मग सोबत नाश्ता करून निरंजन त्यांच्या घरी पिंपरी कडे निघून गेला आणि आम्ही दोघे पुण्याकडे निघालो। 11:30 वाजता 'सकाळ' पेपरच्या हेड ऑफिसला माझी मुलाखत आणि 10:45 ला किसन टाकमोडे ने शनिवार वाडा येथे देणे समाजाचे अंतर्गत अभ्यासिकेच्या मुलांकडून जमा केलेल्या पैश्यातून मदत असा कार्यक्रम आयोजित केला होता. मग आम्ही देखील वेळेचे भान पाळत मस्त पावसात पेडलिंग करत विश्रांतवाडी, येरवाडा, संचेती हॉस्पिटल मार्गे शनिवार वाडा येथे पोहोचलो. किसन टाकमोडे आणि गणेश नरसाळे दोघेही सोमनाथ श्रमसंस्कार छावणीचे शिबिरार्थी मी देखील सोमनाथ चा 2012,13 चा शिबिरार्थी त्यामुळे आमचे एक जिव्हाळाचे नाते कारण दोघांचे प्रेरणास्थान बाबा आमटे आणि आनंदवन. त्या दोघांनी अभ्यासिकेच्या 50 विद्यार्थ्यांकडून 10/- प्रति व्यक्ती प्रमाणे 500/- रुपयाची मदत सेवालय प्रकल्पातील विद्यार्थ्यांच्या पुनर्वसनासाठी माझ्याकडे सुपूर्द केली. तितक्यात अमोल काकडे भेटायला आला.  'वैष्णव भेटीचा सोहळा' म्हणतो त्याप्रमाणे सोमनाथ कॅम्प मधील एकएक मित्र ज्यांची अनेक वर्षा नंतर भेट होत होती. अमोल काकडे एके काळी विद्यार्थी संघटना आणि चळवळीतील सक्रिय कार्यकर्ता आणि सध्या तो दै. पुण्य नगरी  मध्ये पिंपरी चिंचवड येथे वार्ताहर आहे. त्याच्याशी चर्चा करत सकाळ हेड ऑफिस ला पोहोचलो. सकाळ च्या रिपोर्टर प्रियंका तुपे यांनी आमचे स्वागत केले. कॅन्टीन मध्ये चहा पित एचआयव्ही बाधित बालकांच्या मूलभूत प्रश्न व स्वयंरोजगार व सध्या सुरू केलेला सॅनिटरी पॅड चा प्रकल्प विषयी चर्चा केली। पुढे 12:30 वाजता सकाळ फेसबुक लाईव्ह च्या स्टुडियोवर पोहोचलो. लाईव्ह मुलाखत ची पहिलीच वेळ होती. कॅमेरा, रेडी कमांड नंतर प्रियांका च्या एकेक प्रश्नाला कोणतेही दडपण न ठेवता उत्तरे देत होतो. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या क्षेत्रात 10 वर्षांपासून मी स्वतः या क्षेत्रात कार्य करत असल्याने या मुलाखत विषयी कोणतीही पूर्व तयारी अथवा प्रश्नावली नसताना उत्तरे देत होतो.  आजवर ची सायकल वारी, त्यातील विविध अनुभव, वारी मागील उद्देश, त्याचा समाज व जनसमान्यांशी संवाद व प्रभाव, आजवरचे अंतर, 18 वर्ष पूर्ण झालेल्या एचआयव्ही बाधित विद्यार्थ्यांचा स्वयंरोजगार व प्रशिक्षणाचा प्रश्न व त्यासाठी आजवर केलेले विविध प्रयत्न, सध्या चे एचआयव्ही चा प्रसार मधील घटलेले प्रमाण, आई कडून बाळाला होणार एचआयव्ही चा घटलेला संसर्ग याविषयी छान चर्चा झाली। शेवटी सकाळ टीमचे आभार मानून आम्ही निघालो। 1 वाजले होते व 2 वाजता खराडी येथे डॉ गौरी निरखे हिने विवेकानंद विवेक मंच च्या माध्यमातून माझ्या एड्स जनजागृती संवाद कार्यक्रमाचे आयोजन गेरा सोसायटी खराडी येथे केले होते.
पेडलिंग करत येरवाडा पर्यंत आलो होतो. पाऊस थांबला होता पण गर्मीमुळे घामाच्या धारा वाहू लागल्या. कंटाळून रेनकोट बॅग मध्ये भरले पुन्हा परत घालायची गरज पडू नये म्हणून. 2 वाजता गेरा सोसायटी येथे डॉ गौरी मंगेश पाटील यांच्या कडे आयोजित जनजागृती कार्यक्रमास पोहोचलो. गौरी तशी माझ्या बायकोची डिकेएमएम कॉलेज औरंगाबाद मधील ज्युनियर व मैत्रीण मूळची जालना व लग्नानंतर पुणे येथे रहायला आलेली. आम्ही दोघे फेसबुक वरील मित्र आणि फेसबुक वरील सायकल वारीची पोस्ट वाचल्यावर तिने केलेला हा सर्व प्रयत्न. सोसायटी मधील विविध भाषा, प्रांत, राज्यातील पण मुलं मुली अथवा सुनबाई यांच्या नोकरीमुळे स्थलांतर झालेली कुटुंबातील ज्येष्ठ आजी आजोबा या कार्यक्रमास उपस्थित होते. फ्लॅट च्या प्रवेश द्वारावरच गौरी ने एड्स जनजागृती चा संदेश देणारी सुंदर रांगोळी काढली होती. तेथील उपस्थित सर्वांना नमस्कार करून सर्वांशी ओळख करून मी आपल्या मनोगताला सुरवात केली.  जीवनरेखा बालगृहतील एचआयव्ही बाधित विद्यार्थांशी जुलै 2008 मधील पहिली भेट ते त्यांच्या पोषक आहार, आरोग्य समस्या, तेथील अस्वच्छता, रोगराई, वारंवार आजारी पडणे, बालमृत्यू, अंतिम संस्कार च्या वेळी नातेवाईकांचा उपस्थित राहण्यास नकार, विविध सण साजरे करून परिवर्तनाचा प्रयत्न, शाळेत प्रवेश, सेवालय प्रकल्प लातूर येथे स्थलांतर, हॅपी म्युझिक शो, आंब्याची लागवड व विक्री तसेच गणेश मूर्ती तयार करणे व विक्री उपक्रमातून स्वयंरोजगार व प्रशिक्षणचे धडे तसेच एचआयव्ही एड्स विषयी असलेले विविध समज गैरसमज आदी विषयावर अनुभव व एड्स जनजागृती साठी सायकलिंगच का ? व आजवर केलेला प्रवास इत्यादी  प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून संवाद साधला. उपस्थितांनी देखील खूप छान प्रतिसाद दिला. डॉ गौरीच्या आईने आदरातिथ्याने आम्हास जेऊ घातले. 4 वाजले होते त्यांचा निरोप घेऊन निघालो तर फ्लॅट च्या गेट जवळ माझा सोमनाथ शिबिरातील मित्र पवन इंदूरकर पत्ता शोधत मला भेटायला आला होता. त्याने प्रवासासाठी पेंड खजूर आणले होते ते आम्ही पालवी पंढरपूर येथील मुलांना दिले.
त्याला भेटून वेळेची मर्यादा असल्याने निरोप घेऊन पेडल मारत निघालो. हडपसर पर्यंत ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी होती तरी त्यातून मार्ग काढत हडपसर येथील संत तुकाराम महाराज उड्डाण पूल ओलांडला. चौफुला 55 किमी बाकी होते आणि 04:30 वाजले होते. व्यवस्थित प्लॅन केले व उरली येथे एनरझल ओआरएस पाण्यात मिसळून घोट घोट पीत आम्ही सायकलिंग करत होतो. सायंकाळ ची वेळ असल्याने प्रचंड वाहतूक होती. दोघे एका मागे एक असे लयबद्ध सायकलिंग करत यवत गाठले.आता चौफुला केवळ 10 किमी होते जे आम्ही सहज पार करत दिवसभरातील ११४ किमी सायकलिंग करत चौफुला पोहोचलो. मुक्कामाची सोय अनिल गडवे यांनी स्वतःचे हॉटेल जगदंबा येथे केली होती.हॉटेल मध्ये आम्ही थांबत नसल्याचे कळवले परंतु ते लॉज बंद असून केवळ कौटुंबिक अथवा नातेवाईक व्यक्तींनाच देतात. त्यांनी एक पैसा न घेता आंमची रहाण्याची, जेवण्याची सोय केली. फ्रेश होऊन गावात थोडे फिरून लवकर झोपी गेलो.

पुणे आळंदी पंढरपूर एक ऊर्जा देणारी सायकलवारी - प्रस्तावना


वारी म्हणजे काय असते ? माझी आजी अनेक वर्षे पायी आळंदी ते पंढरपूर च्या दिंडीत जायची आता वयामुळे शक्य होत नाही. पण वारी म्हणजे केवळ दिंडीत पायी चालणे इतकेच माहीत होते. 2014 मध्ये पहिल्यांदाच मी सायकलवर वारी करूया असा विचार आला आणि ते पण परभणी ते पंढरपूर ! मग वाटले आपल्याला हरीपाठ वगैरे केवळ 'हरी मुखे म्हणा' इतकेच माहीत. पण आपला हरी ? आपला विठ्ठल ? म्हणचे समाजातील एचआयव्ही बाधित बालकांची सेवा व त्यांच्या मूलभूत प्रश्नावर सुरू असलेले कार्य हेच ना.
माझं खूप काही वाचन नव्हते परंतु डॉ नरेंद्र दाभोलकरांची काही व्याख्याने, गाडगेबाबा विषयी त्यांनी लिहिलेले लेख वाचून व युट्युब वर बघून होतो. संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांनी त्यांच्या शिकवणीतून समाजप्रबोधनाचे कार्य केले यामुळे मला वारी ही समाजप्रबोधनासाठी अत्यंत प्रभावी माध्यम वाटली.
म्हणून मग मी विचार केला आणि त्याप्रमाणे सायकलवर परभणी ते पंढरपूर अशी वारी जून 2014, डिसेंबर 2014, जुलै 2016 मध्ये केली. तर मागील वर्षी पुणे आळंदी पंढरपूर सायकलवारी जून 2017 मध्ये केली.
मागच्या वर्षी पूणे आळंदी पंढरपूर वारीतून एचआयव्ही एड्स या विषयावर प्रबोधनात्मक उपक्रमास छान प्रतिसाद मिळाला म्हणून मग याही वर्षी पुणे आळंदी पंढरपूर कुर्डुवाडी असा सायकल प्रवास आखला. तशी ही सायकलवर केलेली पाचवी वारी.
यावर्षी मग प्लॅनिंग केली पुणे स्टेशन देहू आळंदी भिगवण पंढरपूर कुर्डुवाडी असे 13 जुलै ते 15 जुलै दरम्यान ३ दिवसात करूया. परंतु 13 जुलै रोजी पुण्यात सकाळी 11 ते 3 दरम्यान 3-4 जनजागृती पर कार्यक्रम असल्याने देहू ड्रॉप करावे लागले.
सुरवातीला मार्च मध्ये सेवालय प्रकल्पातील 2 विद्यार्थांना सायकली घेऊन दिल्या होत्या त्या प्रमाणे त्यांना सोबत घेऊन सायकलवारी करायची इच्छा होती. परंतु जून महिन्यात सुट्या मध्ये त्यांचा सरावात खंड पडल्याने, शिवाय रोजचे अंतर 120-130 किमी व पावसाचे दिवस व अत्यंत हेवी ट्रॅफिक व सुरक्षिततेच्या दृष्टीने नाईलाजाने त्यांना नम्रपणे नकार दिला.
मी आणि आकाश गीते असा प्लॅन करून पनवेल एक्सप्रेस ट्रेन ने पुणे जायचे आणि सायकली रेल्वे पार्सल व्हॅन मध्ये असा प्लॅन केला. अपेक्षेप्रमाणे परभणी पार्सल ऑफिस चे सहकार्य देखील मिळाले.